शैलजा तिवले

मुंबईत करोनाची तिसरी लाट ओसरताच मरणोत्तर अवयवदान मोहिमेने वेग घेतला आहे. जानेवारीमध्ये शहरात पाच मरणोत्तर अवयवदाने झाली.

several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

करोनामध्ये परिणाम काय झाला?

अवयवदानाची मोहीम सुरू झाल्यापासून गेल्या दोन दशकांमध्ये सर्वाधिक अवयवदान २०१९ साली मुंबईत झाले. या वर्षी ७९ दात्यांनी मरणोत्तर अवयवदान केले. परंतु करोनाची साथ २०२० साली सुरू झाली आणि सर्व रुग्णालये करोनाच्या उपचारासाठी खुली केल्यामुळे मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या मोहिमेवर याचा परिणाम झाला.  मुंबईत अवयवदानाच्या मोहिमेला चांगलाच फटका बसला असून २०१९ च्या तुलनेत २०२० आणि २०२१ मध्ये अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये जवळपास निम्म्याने घट झाली. यावर्षी तिसरी लाट वेगाने ओसरल्यामुळे अवयवदान मोहिमेला पुन्हा बळ मिळाले आहे. रुग्णालये अन्य आजारांसाठी खुली झाल्यामुळे अवयवप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांची संख्याही हळूहळू वाढत आहे.

मृत्यूनंतर कोणत्या अवयवांचे दान करता येते आणि कसे करता येते?

विभागीय अवयवदान समन्वय समितीच्या सुजाता अष्टेकर सांगतात, ‘एखाद्या व्यक्तीची ‘ब्रेन डेथ’ झाल्यास सर्वाधिक अवयवांचे जसे हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, आतडी, हात इत्यादी अवयवांचे दान करता येऊ शकते. तसेच नेत्रपटल, हृदयाच्या झडपा, त्वचा, हाडे यांचे दानदेखील करता येते’.

‘ब्रेन डेथ’ ही फक्त सरकारमान्य रुग्णालयामध्येच घोषित करता येते. ज्यांचा प्रतिरोपण शस्त्रक्रियेशी संबंध नाही, असे सरकार मान्यताप्राप्त चार डॉक्टर ‘ब्रेन डेथ’ घोषित करतात. ‘ब्रेन डेथ’ व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अवयवदान होते. ‘ब्रेन डेथ’ला मानवी अवयव आणि उती प्रत्यारोपण कायदा-१९९४ नुसार मान्यता आहे.

घरी मृत्यू झाल्यास, सर्वसाधारणपणे नेत्रदान आणि त्वचादान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत होऊ शकते. लवकरात लवकर जवळच्या नेत्रपेढीला आणि त्वचापेढीला कळवणे आवश्यक आहे. तसेच, ‘कार्डिअ‍ॅक डेथ’ म्हणजे हृदय थांबल्याने मृत्यू झाल्यास हाडेही दान होऊ शकतात.

अवदानाबाबतचे पुढील वास्तव मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे…

अवयवदानानंतर अंत्यविधी करता येतो.

अवयवदानाने मृतदेहाला विद्रूपता येत नाही.

‘अवयवदान’ हा शब्द वापरला गेला आहे, त्यामुळे दान करणाऱ्या कुटुंबीयांना कुठलाही आर्थिक मोबदला दिला जात नाही. हे एक नि:स्वार्थी आणि परोपकारी दान आहे.

अवयवदानाला मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार मान्यता आहे. हे दान कायद्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच केले जाते. समाजमाध्यमांवरील संदेश वाचून संपर्क केलेल्या व्यक्तींना अवयव प्रत्यारोपण केले जात नाहीत. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी व्यक्तीला आधी नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी केलेल्या व्यक्तींमधील आजार, वय, अवयवांची आवश्यकता किती लवकर आहे, यानुसार अवयव प्रत्यारोपणाचा निर्णय समितीमार्फत घेतला जातो.

अवयवांची खरेदी आणि विक्री हा कायद्याने गुन्हा आहे. दान केलेले अवयव विकले जात नाहीत.

महाराष्ट्रात अंतर्गत अवयवांचे वितरण विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीद्वारे केले जाते. ती सरकारनिर्मित आणि सरकारमान्य संस्था आहेत.

राज्य आणि प्रादेशिक स्तरावर अवयवांचे वितरण प्रादेशिक आणि राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था या सरकारी संस्थेद्वारे केले जाते.

मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय जिवंतपणी घेता येतो का?

१८ वर्षांवरील भारतीय नागरिक प्रतिज्ञापत्र भरून मृत्यूनंतर आपले अवयवदान व्हावे अशी इच्छा नोंदवून ठेवू शकतो. आपण आपल्या जवळ अवयवदानाचे ‘डोनर कार्ड’ही बाळगू शकतो, जेणेकरून नातेवाईकांना आपली इच्छा कळेल.

मरणोत्तर अवयवदान करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी या बाबी करणे गरजेचे आहे…

अवयवदानासाठी प्रतिज्ञापत्र भरणे

डोनर कार्डची प्रिंट घेऊन, त्यावर स्वाक्षरी करून ते सतत आपल्याजवळ बाळगणे.

डोनर कार्डवरील अवयवदान संस्थेचे क्रमांक मोबाइलमध्ये जतन करणे किंवा ते ठळकपणे नोंदवहीत लिहिणे

आपली इच्छा आपले जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना सांगणे किंवा त्यांच्याशी चर्चा करणे. मृत व्यक्तीने आधी अवयवदानाचा अर्ज भरला असला तरी, अवयवदानासाठी जवळच्या नोतवाईकांची संमती आवश्यक आहे.