भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जवदचा चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हे वादळ ४ डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचू शकते. नैऋत्य मान्सून संपल्यानंतर हे पहिलेच चक्रीवादळ आहे. बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरला चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र लवकरच जवद चक्रीवादळाचे रूप धारण करेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जवद चक्रीवादळाचे नाव कसे पडले?

माध्यमांच्या वृत्तानुसार, जवद चक्रीवादळात ताशी ११७ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या सूचनेनुसार हे नाव देण्यात आले आहे. जवद हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ उदार किंवा दयाळू असा होतो. त्याच्या नावाप्रमाणे, हे वादळ तितके विनाशकारी असण्याची शक्यता नाही.

थायलंडच्या किनारपट्टीवर कमी दाबाची पट्टा निर्माण झाला आहे आणि तो लवकरच अंदमान समुद्रात प्रवेश करेल. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र मजबूत होऊन २ डिसेंबरपर्यंत ते बंगालच्या उपसागरात पोहोचेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. चार डिसेंबरच्या सकाळी चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाची किनारपट्टी ओलांडू शकते, असे आयएमडीने म्हटले आहे.

मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वातावरणामुळे भारतीय हवामान विभागाने या राज्यांमध्ये बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये चार दिवस सतत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच मुंबईत मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

चक्रीवादळामुळे ९५ रेल्वे गाड्या रद्द

हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने केंद्र सरकारतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. जवद वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडूनही खबरदारी घेतली जात आहे. ३ आणि ४ डिसेंबर रोजी या मार्गांवरून जाणाऱ्या ९५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजित साहू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, जवद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून ९५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोस्ट रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्‍या आणि या भागातून जाणाऱ्या अप-डाऊनसह ९५ गाड्या ३ आणि ३ डिसेंबरसाठी रद्द झाल्या आहेत.

या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुरीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या पुरुषोत्तम एक्स्प्रेस, निलांचल एक्स्प्रेस, नंदनकानन एक्स्प्रेस तसेच भुवनेश्वरहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या अप आणि डाउन गाड्यांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे रेल्वे सिग्नलिंग सिस्टम, पूर रेल्वे ट्रॅक आणि विजेचे खांब खराब होऊ शकतात. अंदमान समुद्राजवळ उगम पावलेल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळ जवदचा यावेळी बंगालच्या उपसागरावर तसेच अरबी समुद्र आणि हिंदी महासागरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात अम्फान चक्रीवादळामुळे १३ कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले होते आणि १.५ कोटी घरांचे नुकसान झाले होते. अम्फान चक्रीवादळ येण्यापूर्वीच ३० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.