दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एखादा विजय मिळवणे ही पूर्वी उपलब्धी (अचीव्हमेंट) मानली जायची. पण विराट कोहलीचा हा संघ आज दक्षिण आफ्रिकेत हरणे हा धक्कादायक पराभव (अपसेट) मानला जातो. या प्रवासाचे संपूर्ण श्रेय निःसंशय विराटला द्यावे लागेल, हे माजी कसोटीपटू वासिम जाफरचे शब्द तंतोतंत खरे आहेत. विराट कोहलीने भारतीयांना सर्वत्र पण विशेषतः परदेशी मैदानांवर खेळण्याची नव्हे तर जिंकण्याची सवय लावली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावापुढे एकही ट्रॉफी लागलेली नसली, तरी कसोटी  क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय विराटच्या हार न मानण्याच्या वृत्तीमुळेच मिळाले हे त्याचे टीकाकारही नाकारू शकत नाहीत. त्याच्या या प्रवासाचा हा धावता आढावा आणि त्याने कसोटी कर्णधारपद का सोडले याची थोडक्यात मीमांसा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील अनेक माजी क्रिकेटपटू, जे आज आघाडीचे क्रिकेट विश्लेषक बनले आहेत, विराट कोहलीला कसोटी क्रिकेटचा शेवटचा तारणहार मानतात. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटमधील कामगिरीला मर्यादित षटकांतील कामगिरीइतकेच महत्त्व दिले. किंबहुना, जागतिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा मिळवायची असेल, तर परदेशी मैदानांवर कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी उंचावली पाहिजे हे त्यांनी ओळखले. हे महत्त्व आपल्या तरुण सहकाऱ्यांच्या मनात टी-२० लीगच्या ऐन भरात रुजवणे ही आणखी अवघड कामगिरी या दोघांनी करून दाखवली.

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

कसोटी क्रिकेटला परम महत्त्व…

आकडे दर्शवतात कर्णधार विराटचे मोठेपण…

सामने – ६८

विजय – ४०

पराभव – १७

अनिर्णीत – ११

जय-पराजय गुणोत्तर – २.३५२

विराट कोहलीपेक्षा अधिक कसोटी सामने केवळ ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) या तीनच कर्णधारांनी जिंकलेले आहेत. विराटच्या खालोखाल विख्यात विंडीज कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांचा क्रमांक लागतो. यावरून विराट  कोहलीच्या नेतृत्वाचा प्रभाव लक्षात   येईल. लॉइड आणि वॉ-पाँटिंग यांनी त्या-त्या काळातील दिग्विजयी संघांचे नेतृत्व केले होते. विराट   कोहलीला २०१४मध्ये जो भारतीय   संघ मिळाला तो दिग्विजयी वगैरे नव्हता. ग्रॅमी स्मिथच्या दक्षिण आफ्रिकी संघाप्रमाणे त्याच्या संघात ढीगभर अनुभवी सहकाऱ्यांचा भरणाही नव्हता. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश अभूतपूर्वच म्हणावे लागेल.

विराटनं टेस्ट कॅप्टनशिप सोडली अन् धोनीची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

‘सेना’ देशांतील कामगिरीचा लेखाजोखा

विराट कोहली हा भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरतो. महेंद्रसिंह धोनी (६० सामन्यांत २७ विजय) आणि सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय)  यांचा क्रमांक त्यांच्या नंतरचा. घरच्या मैदानांवर विराट कोहलीने ११ मालिका जिंकल्या आणि एकही गमावली नाही वा बरोबरीत सोडवली नाही. 

परदेशी मैदानांवर सर्वाधिक कसोटी विजय विराटच्याच नेतृत्वाखाली नोंदवले गेले. ४०पैकी १६ सामने भारताने त्याच्या नेतृत्वाखाली परदेशी मैदानांवर जिंकले. श्रीलंका (२-१, २०१५), वेस्ट इंडिज (२-०, २०१६), श्रीलंका (३-०, २०१७), ऑस्ट्रेलिया (२-१, २०१८-१९), वेस्ट इंडिज (२-०, २०१९) यांतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय अर्थात सर्वाधिक संस्मरणीय.

‘‘अभिनंदन विराट…”, कसोटीचं कर्णधारपद सोडताच BCCIनं कोहलीसाठी केलं ‘असं’ ट्वीट!

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये (सेना – एसईएनए) अधिकाधिक यश मिळवण्याची विराटची महत्त्वाकांक्षा सुरुवातीपासूनच होती. या देशांमध्ये तो आजवरचा सर्वाधिक यशस्वी आशियाई कर्णधार ठरला. न्यूझीलंडमध्ये एक वेळा, इंग्लंडमध्ये एक वेळा आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन वेळा त्याच्या नेतृत्वाखालील संघाने मालिका गमावली. पण या देशांमध्ये सर्वाधिक ७ कसोटी विजय त्याच्या नावावर आहेत. त्याच्या खालोखाल धोनी आणि मन्सुर अली खान पतौडी यांच्या संघांनी प्रत्येकी ३ सामने जिंकले. इतर आशियाई कर्णधारांमध्ये विराटनंतर खूप खाली जावेद मियाँदाद आणि वासिम अक्रम या पाकिस्तानी कर्णधारांचा (प्रत्येकी ४ विजय) क्रमांक लागतो. तरीही विराटच्या स्वतःच्या मानकांचा विचार केल्यास, ‘सेना’ देशांतील यश संमिश्र मानावे लागेल. इंग्लंडविरुद्ध गतवर्षी अर्धवट आवराव्या लागलेल्या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर होता. परंतु त्या मालिकेतील उर्वरित सामना इतर कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. ऑस्ट्रेलियात अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा ३६ धावांमध्ये खुर्दा उडणे हा कर्णधार विराटच्या दृष्टीने नेतृत्वाचा रसातळ. कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टप्प्यात गळपटणे किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीतही शेवटच्या टप्प्यात कच खाणे हे अपयश विराटला अखेरपर्यंत खुपत राहील.

कर्णधार म्हणून फलंदाजीतील कामगिरी…

एकंदरीत आकडेवारी अत्यंत चांगली म्हणावी अशीच.  

सामने ४०

धावा ५८६४

शतके २०

अर्धशतके १८

सरासरी ५४.८०

मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये विराटच्या फलंदाजीला घरघर लागल्याची स्पष्ट चिन्हे होती. बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर २०१९मध्ये शतक झळकवल्यानंतर विराटला एकदाही शतकी मजल मारता आली नाही. या काळात त्याने अवघ्या २८.१४च्या सरासरीने ७६० धावा जमवल्या, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. नेतृत्वाचा थेट परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊ लागल्याची ही स्पष्ट लक्षणे होती.

मग तडकाफडकी नेतृत्व सोडण्याची कृती कशासाठी?

याची बीजे बीसीसीआयबरोबर गेले काही आठवडे  सुरू असलेल्या सुप्त संघर्षात रोवली गेली असावीत. टी-२० कर्णधारपदाबाबत त्याने केलेला दावा थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला तोंडघशी पाडणारा ठरला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला यश मिळते, तर कदाचित हा निर्णय विराटने घेतलाही नसता. पण ही मालिका अनपेक्षितरीत्या विराटच्या हातातून निसटली. वर म्हटल्याप्रमाणे अशीही त्याची फलंदाजी विराटच्या दर्जानुरूप होत नव्हतीच. तशात रवी शास्त्री निवृत्त झाल्यामुळे विराट एकाकीही पडला असावा. शास्त्रींप्रमाणे त्याचे समीकरण अनिल कुंबळेशी जुळू शकले नव्हते. राहुल द्रविडच्या बाबतीत तसेच काही होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कुंंबळे किंवा द्रविड हे शिस्त आणि व्यवस्थेला महत्त्व देणारी व्यक्तिमत्त्वे. शास्त्री तुलनेने अधिक अघळपघळ, पण ते विराटला त्याचा अवकाश पूर्णपणे बहाल करणारे होते. अशा प्रकारे स्वातंत्र्य देऊन किती ट्रॉफी जिंकल्या या रोकड्या प्रश्नावर मात्र विराट-शास्त्री दुकलीला कागदोपत्री समाधानकारक उत्तर देता येत नसावे. खांदेपालट करायचाच, तर तो पूर्णपणे करावा आणि नवीन नेतृत्वाला संधी द्यावी असा विचार बीसीसीआय आणि निवड समितीने केलेला असू शकतो.

तसाही विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील स्वतंत्र व समांतर सत्ताकेंद्र बनला होताच. त्याचे अस्तित्व प्रमाणाबाहेर मान्य केल्यास बीसीसीआयच्या अधिकारांचेच आकुंचन झाले असते. ते घडणार नव्हते. विराटचा राजीनामा हा या सत्तासंघर्षाची परिणतीही असू शकतो!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained virat kohli steps down as india test captain abn 97 print exp 0122
First published on: 16-01-2022 at 11:43 IST