एकादशी महात्म्य कथा आपल्या प्रत्येकाला माहीत असायलाच हवी. एकादशीला अनादी काळापासून महत्त्व आहे. यातच आषाढी एकादशीला पाऊस देखील तूफान पडतो. आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक या प्रत्येक कथा माहीत असतात. एकादशीला तूफान पाऊस का पडतो? याबद्दलची कथा जाणून घेऊयात. भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले.त्यामुळे दरवर्षी एकादशीला पाऊस हा पडतोच. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.