scorecardresearch

कोकणातचं नाहीतर भारतातील ‘या’ ७ शहरांमध्येही घेतले जाते सर्वोत्तम आंबा प्रजातीचे उत्पादन

कोकणासोबत आणखी कोणत्या राज्यात कोणत्या प्रजातीच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते जाणून घ्या.

Indian Mango Destinations travel tourism these 8 indian cities have worlds best kind of mangoes
कोकणचं नाही तर भारतातील 'ही' ७ शहरं जगात सर्वोत्तम आंब्यांसाठी आहेत प्रसिद्ध

Indian Mango Destinations : आंबा हा फळांचा राजा मानला जातो. यात हापूस आंब्याची प्रजाती सर्वोच्च स्थानी आहे. फक्त उन्हाळ्यात मिळणारे हे फळं आवडत नाही असे म्हणणारे फार कमी असतील. यामुळे आंब्यासाठी अनेकजण उन्हाळ्याची वर्षभर वाट बघत असतात. अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी हे फळ पाहून स्वत:वर नियंत्रण ठेवणे कठीण होते. यामुळे कितीही पोट भरल तरी आंबा खाण्याला कोण नाही म्हणू शकत नाही. यामुळे भारतात आंब्याचे उत्पादन तर मोठे आहेच सोबत त्याची मागणीही तेवढीच आहे. पण आजवर आपण कोकणातील आंबा जगात प्रसिद्ध असल्याचे ऐकून आहोत. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे दोन जिल्हे आंबा उत्पादनासाठी ओळखले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त कोकणचं नाही भारतात अशी ७ शहरं आहेत जी सर्वोत्तम प्रजातीच्या आंबा उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतात सर्वोत्तम आंबा कुठे मिळतात.

१) महाराष्ट्र: हापूस

महाराष्ट्रातील अल्फान्सो किंवा हापूस आंबा जगभरात खूप प्रसिद्ध आहे, जो महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इतर कोकण भागातून येतो. हा आंबा त्याच्या गोड चवीसाठी ओळखला जातो. हापूस ही भारतातील आंब्यांच्या प्रजातीमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी पहिली प्रजाती आहे.

२) गुजरात: केशर

आमरस बनवण्यासाठी गुजरातचा केशरआंबा खूप प्रसिद्ध आहे. त्याची गोड चव, भरीवपणा आणि केशरचा सुगंध यासाठी ही प्रजाती अनेकांना आवडीची आहे. आमरस हे उन्हाळ्याच्या हंगामात प्यायले जाणारे एक लोकप्रिय पेय आहे, त्यामुळे केशर आंब्यांनाही तेवढीच मागणी असते.

३) आंध्र प्रदेश: बंगनपल्ली

बंगनपल्ली ही आंब्याची प्रजाती लगद्याप्रमाणे भरलेली असते. आंध्रमधील बंगनपल्ले या शहराच्या नावावरून या आंब्याच्या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. याठिकाणी बंगनपल्ली आंब्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.हा दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आंबा आहे.

४) उत्तर प्रदेश: दशहरी

उत्तर प्रदेशच्या दशहरी आंब्याच्या प्रजातीला मलिहाबादी आंबा असेही म्हणतात. दशहरी आंबा हा भारतातील उत्तरेकडील प्रदेशातील सर्वात लोकप्रिय आंब्याच्या जातींपैकी एक आहे. उत्तर प्रदेशातील मलिहाबादमध्ये या प्रजातीच्या आंब्याचे सर्वाधिक उत्पादन होते.

५) हिमाचल प्रदेश: चौसा

उत्तर भारतात सर्वात गोड आंबा म्हणून चौसा या आंब्याच्या प्रजातीला ओळखले जाते. चौंसा हा आंबा गोड तर असतो,पण तो आतून भरीव आणि रंगाने गडद पिवळा असतो. प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये या आंब्याचे उत्पादन घेतले जाते, पण हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि काही इतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये देखील त्याचे उत्पादन घेतले जाते.

६) कर्नाटक: तोतापुरी

तोतापुरी ही आंब्याची अशी एक प्रजाती आहे जिची चव आंबट-गोड लागते. दक्षिण भारतात आंब्याचा हा प्रकार खूप आवडीने खाल्ला जातो. हा आंबा लोणचे आणि सॅलडमध्ये वापरला जातो. या आंब्याचा रंग हिरवा असला तरी वरून तो पोपटाच्या चोचीसारखा दिसतो, म्हणून त्याला तोतापुरी असे म्हणतात. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये याचे उत्पादन प्रामुख्याने केले जात

७) बिहार: लंगडा

लंगडा आंबा हा उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय प्रजाती आहे. लंगडा याचा शाब्दिक अर्थ अपंग असा होतो. पण या आंब्याला लंगडा असे नाव ठेवण्यामागेही एक गोष्ट आहे ती म्हणजे ही आंब्याची प्रजाती सर्वप्रथम बनारस (आता वाराणसी) येथील एका लंगड्या माणसाच्या बागेत वाढली, म्हणून त्याला लंगडा नाव देण्यात आले. उत्तर प्रदेश आणि बिहार व्यतिरिक्त, मध्य प्रदेश, ओडिशा आणि अगदी पंजाबच्या अनेक भागांमध्ये देखील याचे उत्पादन घेतले जाते.

८) पश्चिम बंगाल: हिमसागर आणि किशन भोग

किशन भोग आंबा आकाराने गोलाकार आणि चवीला गोड असतो. पश्चिम बंगालमध्ये किशन भोग आंबे मोठ्या प्रमाणात विकले जातात. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हे सर्वात प्रसिद्ध आहे. दुसरीकडे हिमसागर आंबा मिठाई आणि थंड पेयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:38 IST

संबंधित बातम्या