काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या पर्यटकांच्या भीषण हल्ल्यानंतर सुरक्षेच्या परिस्थितीबाबत सातत्याने उच्चस्तरीय बैठका होत आहेत. भारत पाकिस्तान विरोधात ठोस पावले उचलण्याच्या तयारीत आहे. दहशतवाद मूळापासून संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला निर्णय घेण्याची मोकळीक दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज चार मोठ्या बैठका घेतल्या आहेत. पाकिस्तानविरोधातील निर्णयासाठी या बैठका महत्त्वाच्या असल्याचे सांगितले जात आहे. यात सीसीएस, सीसीपीए, सीसीईए आणि कॅबिनेट बैठकांचा समावेश आहे. परंतु, सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईए यांचा अर्थ काय? जाणून घेऊयात.
सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी)
‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ देशाच्या सुरक्षेशी संबंधित निर्णय घेते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्यांच्या व्यतिरिक्त या समितीत गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री यांचा समावेश असतो. ही समिती दहशतवाद, युद्ध, संरक्षण धोरणे आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेते.
सीसीपीए (कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर)
कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर ही समिती राजकीय घडामोडींसाठी असते. देशातील प्रमुख राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या समिती अंतर्गत बैठका घेतल्या जातात. ही समिती केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधांसाठी महत्त्वपूर्ण असते. विशेषतः जेव्हा केंद्र आणि राज्याला एखाद्या मुद्द्यावर मिळून काम करायचे असेल.
कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर समिती देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या परराष्ट्र धोरणाच्याबाबींशीदेखील संबंधित आहे. सीसीपीएची बैठकदेखील पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाते. या समितीमध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री, रस्ते वाहतूक आणि वाहतूक मंत्री, अर्थमंत्री, आरोग्य मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो. या समिती अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीत राजकीय, धोरणात्मक, आर्थिक आणि सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते.
सीसीईए (कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर)
कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर समितीचे म्हणजेच सीसीईएचे काम देशाच्या आर्थिक मुद्द्यांवर निर्णय घेणे आहे. या समितीत देशाचे अर्थमंत्री, नियोजनमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो. ही समिती अर्थसंकल्प, विकास योजना, आर्थिक सुधारणा आणि वित्तीय धोरणांवर चर्चा करते आणि त्यासंबंधीत निर्णय घेते.
कॅबिनेट मीटिंग (मंत्रिमंडळ बैठक)
मंत्रिमंडळाची बैठक ही सरकारकडून सर्वात मोठे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असते. या बैठकीत सरकारचे सर्व मोठे मंत्री पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली भेटतात आणि देशातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करतात. उदाहरणार्थ धोरणे अंमलात आणणे, नवीन कायदे करणे किंवा कोणत्याही मोठ्या मुद्द्यावर निर्णय घेणे. या सर्व समित्या भारत सरकारसाठी महत्त्वाच्या आहेत. देशाची सुरक्षा, आर्थिक स्थिती आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या समित्या आणि त्याअंतर्गत होणाऱ्या बैठकी महत्त्वाच्या ठरतात.