सध्याच्या मनोरंजनविश्वात कलाकृतीपेक्षा तिच्या प्रमोशनवर जास्त मेहनत घेतली जाते हे निर्विवाद सत्य आहे. खासकरून चित्रपटक्षेत्रात हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. चित्रपट कसाही असो त्याचा सोशल मीडियावर गाजावाजा असतो, प्रत्येक चॅनलमध्ये मुलाखती होतात, जबरदस्त पोस्टर्स प्रदर्शित होतात, कधीकधी कॉंट्रोवर्सी होते, मग टीझर येतो आणि मग ट्रेलर्स येतात. अशी पद्धतीशीर हवा तयार करून त्या चित्रपटाचं प्रमोशन होतं.

बड्या बड्या प्रोडक्शनचे चित्रपट आणि त्यांचं प्रमोशन आणखी भव्य असतं पण ढोबळमानाने सध्या प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत हेच गणित आपल्याला पाहायला मिळतं. एवढं सगळं करूनही हातावर मोजण्याइतकेच चित्रपट चालतात. यामागचं सर्वात मोठं कारण या चित्रपटांच्या प्रमोशनमध्येच दडलेलं आहे. ते कारण म्हणजे चित्रपटाचे ट्रेलर. आज ज्या लांबीची गाणी असतात त्याच लांबीचे म्हणजेच ३ ते ३.३० मिनिटांचे चित्रपटाचे ट्रेलर कट करून अन् सगळी गोष्ट त्या ट्रेलरमध्येच मांडून प्रेक्षकांची उत्सुकता मारण्याचे काम हे ट्रेलर्स करत असल्याचं म्हंटलं जात आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आणखी वाचा : चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक करणार होते आत्महत्या पण… शबाना आजमींनी केला खुलासा

पण चित्रपटाचे ट्रेलर्स ही संकल्पना भारतीय चित्रपटसृष्टीत नेमकी कधी सुरू झाली? जुन्या काळातील चित्रपटांचे ट्रेलर्स कसे होते? त्यांचा चित्रपटांवर आणि एकूणच व्यवसायावर कसा फरक पडायचा? हळूहळू या क्षेत्रातही कशी प्रगती झाली? असे अनेक प्रश्न आज आपल्याला पडतात. आज आम्ही यासंदर्भातच खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि समीक्षक दिलीप ठाकूर यांच्याशी लोकसत्ताने संवाद साधला. त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून आज आपण भारतीय सिनेसृष्टीतील चित्रपटांच्या ट्रेलर्सची सुरुवात नेमकी कधी झाली अन् ट्रेलर्सचा एक अनोखा प्रवास जाणून घेणार आहोत.

ट्रेलर्सची सुरुवात कधी झाली?

पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर कोणता हे नेमकं सांगणं कठीण आहे, पण असं म्हंटलं जातं की भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वप्रथम ट्रेलर हा सत्यजित रे यांनी काढला. १९५५ साली आलेल्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रथम त्यांनी कट केल्याचं सांगितलं जातं. चित्रपटाच्या ट्रेलर्सची संकल्पना ही साधारण १९५५ ते १९६० च्या दरम्यान समोर आल्याचं दिलीप ठाकूर यांनीही सांगितलं आहे. त्याआधी चित्रपटाचं प्रमोशन हे पेंट केलेली पोस्टर्स, रेडिओ, लाऊडस्पीकर्स आणि मोठमोठे फलक यांच्यामाध्यमातून होत असे. यानंतर ६० च्या दशकात चित्रपटाचे ट्रेलर लोकांना पाहायला मिळाले.

त्या काळात महिना दोन महिना आधी नव्हे तर चक्क ८ ते १० दिवस आधी येणाऱ्या चित्रपटांचे ट्रेलर्स हे केवळ चित्रपटगृहात दाखवले जायचे. शिवाय कोणत्या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहात दाखवला जाणार आहे याची जाहीर घोषणा केली जात असे. त्यावेळी करमणुकीचे आणखी कोणतेही साधन नसल्याने आपल्याला आवडलेला ट्रेलर पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येत असत.

सेन्सॉरनंतरच ट्रेलरला परवानगी :

६० आणि ७० च्या दशकात संपूर्ण चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यावरच त्यावरून ट्रेलर काढला जायचा. आतासारखं पहिले चित्रपटाचं प्रमोशन आणि मग त्याचं सेन्सॉर प्रमाणपत्र हा कारभार नव्हता. चित्रपटात येणारा कोणताही संदर्भ नसलेल्या संवादामुळे किंवा एखाद्या सीनमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि वाद टळावेत यासाठी सेन्सॉरकडून पास झालेल्या चित्रपटातूनच ट्रेलर कापण्यात येत असे.

टीझरची सुरुवात अन् त्यात झालेली प्रगती :

साधारणपणे २००० च्या अलीकडे म्हणजेच हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटापासून टीझर यायला सुरुवात झाली. ‘कहो ना प्यार है’च्या टीझरमध्ये हृतिकची हुक स्टेप आणि बॅकग्राऊंडला वाजणारं गाणं हा टीझर आजही आपल्या लक्षात असेल. शिवाय याचदरम्यान वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून चित्रपटाचे ट्रेलर्स दाखवले जाऊ लागले. ‘B4U’, ‘Zoom’, ‘ETC’, ‘Mtv’ अशा चॅनल्सची तेव्हा चांगलीच चलती असायची. तरूणांचा एक मोठा वर्ग ही चॅनल्स आवडीने पाहायचा आणि यामुळेच चित्रपटाचे ट्रेलर्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली.

आणखी वाचा : कधी नारंगी, तर कधी पांढरा; अंतराळवीरांच्या सूटच्या रंगांमागचा खरा अर्थ काय?

यानंतर चित्रपटातील एक सुपरहीट गाणं आणि काही सीन्स असे जोडून ट्रेलर्स दाखवायला सुरुवात झाली. ‘खलनायक’च्या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षितचं सुपरहीट ‘चोली के पिछे’ गाण्याचा अंतरा आणि चित्रपटातील काही सीन्सची झलक दाखवून लोकांना आकर्षित करण्यात सुभाष घई यशस्वी झाले. यश चोप्रा यांनीही ‘डर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फक्त शिव-हरी यांचं संगीत आणि काही सीन्स एवढंच दाखवलं होतं. यामुळे चित्रपटाचं संगीत आणि त्यात नेमकं काय बघायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण व्हायला सुरुवात झाली.

एकाहून जास्त ट्रेलर्सची सुरुवात :

आज चित्रपटाची रीतसर हवा करण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जातो. कलाकार त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल माहिती देतात. त्यानंतर त्याचं मोशन पोस्टर, वेगवेगळ्या पात्राची पोस्टर्स, गाण्यांचे छोटेछोटे टीझर आणि मग येणारे वेगवेगळे ट्रेलर्स अशापद्धतीने त्याचं प्रमोशन केलं जातं. ही सुरुवात २००१ मध्ये आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’पासून झाली. या चित्रपटाचे वेगवेगळे ट्रेलर्स आपल्याला पाहायला मिळाले होते आणि वेगवेगळी पोस्टर्सदेखील प्रदर्शित करण्यात आली होती. ‘K3G’नंतर सुरू झालेली ही गोष्ट आज आणखी वेगळी आणि मोठी झाली आहे.

ट्रेलर कट करण्यासाठी खास टीम :

हिंदीपाठोपाठ हा प्रकार आता मराठी चित्रपटसृष्टीतही सर्रास पाहायला मिळत आहे. असं म्हंटलं जातं की सध्या चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर कापण्याचं काम एका स्वतंत्र टीमकडे सोपवण्यात येतं. मोठमोठे दिग्दर्शक स्वतःच ट्रेलर काढतात, पण इतर चित्रपटांच्या बाबतीत ही गोष्ट सरसकटपणे पाहायला मिळत आहे. यामुळेच चित्रपटाच्या ट्रेलर्सवर आणि त्यातून तयार होणाऱ्या प्रेक्षकांवर याचा परिणाम होत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर कापणारी टीम ही त्याकडे एका व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पाहते, पण जेव्हा एक दिग्दर्शक स्वतःच्या चित्रपटाचा ट्रेलर कापतो तेव्हा त्याला त्यात नेमकं काय हवं, काय नको याची चांगलीच कल्पना असते. शिवाय सध्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सगळीच कथा मांडल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम राहत नाही. याला नेमकं कारणीभूत कोण आहे हे सांगणं जरा कठीण आहे, पण एकूणच सध्या चित्रपटाचं होणारं अति प्रमोशनच त्याला मारक ठरत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.