Player Of The Match: आयपीएल २०२५ चा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३० हून अधिक सामने खेळले गेले आहेत. या प्रत्येक सामन्यात कोणत्या ना कोणत्या खेळाडूने आपल्या खास कामगिरीने खेळाची दिशा बदलत आपल्या संघाला विजय मिळवून दिले आहेत. दरम्यान आयपीएलच्या २९ व्या सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले. या सामन्यात, या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जना दमदार विजय मिळवून दिला.

१४ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने अवघ्या ११ चेंडूत २६ धावांची खेळी केली. ज्यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने हा सामना ५ फलंदाज राखून जिंकला. सामन्यातील या कामगिरीसाठी धोनीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दरम्यान सामनावीराच्या पुरस्कारासाठी धोनीचे नाव जाहीर झाल्यानंतर, तो म्हणाला, “सामनावीराचा पुरस्कार मला मिळाला याचे आश्चर्य वाटते. हा पुरस्कार तर शिवम दुबेला मिळायला पाहिजे होता.”

सामनावीराच्या पुरस्काराच्या बाबतीत धोनीने केलेल्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. याचबरोबर चाहत्यांमध्ये पुरस्कार निवडीवरून सोशल मीडियावर वादही सुरू आहेत. अशात, असा प्रश्न उद्भवतो की, आयपीएलमध्ये सामनावीर कोण निवडतो? हा फक्त आकड्यांचा खेळ आहे की त्यामागे आणखी काही गणित असते?

कोण निवडतो सामनावीर?

आयपीएलमधील सामनावीराची निवड समालोचक पॅनेलकडून केली जाते. प्रत्येक सामन्यादरम्यान समालोचन करणारे तज्ञ ही जबाबदारी पार पाडतात. हे पॅनेल ब्रॉडकास्टरद्वारे तयार केले जाते, ज्यामध्ये माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि अनुभवी विश्लेषकांचा समावेश असतो. समालोचक सामना सुरू असताना केवळ समालोच करत नसतात, तर त्यांच्याकडे असलेल्या सामना विश्लेषण पथकाच्या मदतीने आकडेवारीच्या आधारे प्रत्येक क्षणाची परिस्थिती समजावून सांगतात.

सामन्यावर प्रभाव पाडणारा खेळाडू महत्त्वाचा

दरम्यान, सामनावीर निवडताना समालोचकांचे हे पॅनेल, कोणता खेळाडू कोणत्या वेळी मैदानावर आला?दबावाखाली कोणी चांगली कामगिरी केली? कोणता क्षण गेम चेंजर ठरला? याचा विचारही करतात. समालोचकांना हे सर्व तपशील माहित असतात. म्हणूनच, मैदानावर अनेक खेळाडू चमकतात, परंतु समालोचकांचे पॅनेल सामन्याच्या निकालावर सर्वात जास्त प्रभाव पाडणाऱ्या खेळाडूलाच सामनावीर म्हणून निवडतात.

सामनावीराची निवड प्रत्येक वेळी बरोबर असते का?

जरी सामनावीर निवडण्याची पद्धत अनुभवावर आधारित असली तरी, कधीकधी वाद किंवा मतभेद उद्भवतात. बऱ्याचदा चाहत्यांना असे वाटते की, हा पुरस्कार दुसऱ्या एखाद्या खेळाडूला मिळायला हवा होता.

काही तांत्रिक बाबींमध्ये, पंचांचा सल्ला देखील घेतला जातो किंवा त्यांच्या मतांचे निरीक्षण देखील केले जाऊ शकते. पंच फक्त त्यांचे मत मांडू शकतात, पण संपूर्ण निर्णय प्रसारकांचा असतो.