‘ज्ञानेश्वरी आणि विसावे शतक’ या संपादनासाठी मी ‘विसाव्या शतकाची पाश्र्वभूमी’ हा लेख लिहिला होता. त्यात विशेषत: एकोणिसाव्या शतकाची चर्चा होती. महात्मा फुले यांच्या निधन शताब्दीच्या दरम्यान झालेल्या चर्चेत मी फुल्यांवरील तुकोबांचा प्रभाव तसेच वारकरी संप्रदाय व सत्यशोधक समाज यांच्यातील अनुबंध या विषयांवरील वेगवेगळे संशोधन मांडले होते. तोच विचार पुढे नेला तर तुकोबांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची वेगळी मांडणी करता येईल, हे माझ्या लक्षात आले आणि त्यातूनच ‘तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ निर्माण झाला आणि ‘तुकाराम दर्शन’ लिहिता लिहिताच मला पुढचा प्रकल्प सापडला, तो म्हणजे ‘लोकमान्य ते महात्मा’.

‘तुकाराम दर्शन’ हा माझा ग्रंथ पहिल्यांदा ‘साप्ताहिक सकाळ’मधून लेखमाला वा सदर या स्वरूपात प्रसिद्ध झाला. ही लेखमाला मी ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक

सदा डुंबरे यांच्या सांगण्यावरून लिहिली. लेखमाला सुरू झाली तेव्हा मी पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करीत होतो. दहा वर्षे अहमदनगर येथील महाविद्यालयात अध्यापन करून मी १९८५ मध्ये विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात रुजू झालो. लेखमाला सुरू होईपर्यंत माझे तीन कवितासंग्रह आणि ‘मंथन’ नावाचा एक लेखसंग्रह प्रकाशित झाले होते. पुस्तकरूपाने छापले न गेलेले अनेक लेख वेगवेगळय़ा नियतकालिकांतून छापले गेले होते. शिवाय चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून अभ्यासकांच्या व कार्यकर्त्यांच्या वर्तुळात मी बऱ्यापैकी माहीतही झालो होतो. तुकाराम महाराजांचा दहावा वंशज आणि परंपरेने पिढीजात वारकरी अशीही माझी ओळख होतीच; तथापि त्यातील पहिली ओळख शक्यतो प्रगट न करण्यावर माझा कटाक्ष असे.

माझ्या लेखनाच्या विषयांत मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे तत्त्वज्ञानातील समस्या येणे स्वाभाविकच होते. बरेच लिखाण संत वाङ्मयावरील होते. शिवाय, महाराष्ट्राचा, त्यातल्या त्यात आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे त्याच्यासंबंधीही मी लिहीत व बोलत होतोच. इतर कोणाहीप्रमाणे माझे हितसंबंध वर्तमानात गुंतलेले असणे साहजिक होते. या आपल्या वर्तमानाविषयी मला विलक्षण आस्था असे. त्यामुळे तसे लेखनही मी करी; पण इतिहासाबद्दल लिहिताना माझी वर्तमानाशी असलेली बांधिलकी प्रगट झाल्याशिवाय राहात नसे.

आणखी एक मुद्दा! विविध विषयांवरील वेगवेगळय़ा प्रकारच्या लेखनांमुळे माझे स्वत:चे वेगळे म्हणता येईल असे पद्धतिशास्त्र विकसित झाले होते. मी ते करू शकलो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पद्धतिशास्त्राचा अभ्यास हा तत्त्वज्ञानाच्या अभ्यास क्षेत्रातील एक मुख्य विषय असतो. पुणे विद्यापीठात एम.ए. करताना प्रा. सुरेंद्र बारलिंगे आणि प्रा. मो. प्र. मराठे यांच्यामुळे मला आपोआपच पद्धतिशास्त्रीय भान आले. दरम्यान, मद्रास (आता चेन्नई)मधून प्रा. आर. सुंदरराजन हे विद्वान विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांचा नैसर्गिक विज्ञानाच्या व सामाजिक विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा जबर व्यासंग होता. त्यांची व्याख्याने म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच असे. योगायोगाने मी त्याच विषयाचा व्याख्याता म्हणून रुजू झालो होतो. त्यामुळे शिकवण्याच्या निमित्ताने या विषयाचे वाचन करावे लागे. विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात विज्ञानाच्या पद्धतिशास्त्राची खूप चर्चा झालेली आहे. त्यातून आपली स्वत:ची अशी पद्धतिशास्त्राची कल्पना विकसित होणे सहज शक्य असते. माझ्या बाबतीत असेच घडले असावे.

याही बाबतीत क्रमाने सांगायचे झाल्यास माझा प्रवास आधी मार्क्‍सवादाचा अधिकृत मानला गेलेला (रशियन) मुख्य प्रवाह, युरोपातील मानवतावादी मार्क्‍सवादी किंवा नवमार्क्‍सवादी (त्यात लुकाश, क्रिटिकल थिअरीवाले अ‍ॅडार्नो हॅबरमास इत्यादी) व मग कार्ल पॉपर असा झाला. त्यातील भाषेचे स्थान व भूमिका यांच्याबद्दलचा संरचनावादी व विरचनावादी सस्यूर ते फुकोदेरिदा या मार्गे झाला. युरोपात हे सारे प्रवाह एकमेकांच्या संदर्भात, संपर्कात वा संघर्षांतच विकसित झाले होते. या सर्व कमालीच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात अंतानिये ग्राम्सी आणि देशीवादाचे एडवर्ड सैदसारखे यांचा विसर होता कामा नव्हेच.

दरम्यान, नरहर कुरुंदकर, राम बापट आणि

य. दि. फडके यांच्याशी संबंध आला. कुरुंदकरांची धारदार विश्लेषक बुद्धी, बापटांचा विशाल आवाका आणि फडक्यांची तपशिलांवरील पकड यांचाही प्रभाव पडला. समकालिनांपैकी यशवंत सुमंत, राजेंद्र व्होरा, अशोक चौसाळकर, ब्रह्मानंद देशपांडे,

सुहास पळशीकर आदींशी संवाद होताच. मार्क्‍सवाद्यांमधील कॉ. भास्कर जाधव, दत्ता देशमुख, सुधीर बेडेकर या मंडळींचा उल्लेख करावाच लागतो. सुरेंद्र दरेकर, रमेश वरखेडे, सुरेंद्र जोंधळे, दिलीप धोंगडे, रावसाहेब कसबे यांनाही विसरता येत नाही. रा. ना. चव्हाण तर वासाहतिक काळातील महाराष्ट्राच्या धर्मजीवनाचा चालताबोलता कोशच होता.

बाबा आढाव सत्यशोधक समाजाच्या व ब्राह्मणेतर चळवळीच्या अभ्यासाची साधने जमा करण्यात अग्रेसर होते. शरद पाटलांचे लेखन नियमाने वाचत असे, पण त्यामानाने संवाद कमी झाला.

सदा डुंबरे जरी मित्र असले तरी त्यांना एवढे सारे तपशील माहीत असण्याचे कारण नव्हते, पण माझ्या पारंपरिक विषयांवरील लिखाणातही वेगळेपणा असतो हे त्यांच्यातील संपादकाने ओळखले. त्या काळात (नव्वदीच्या दशकाचा मध्य) संत वाङ्मयावर लिहिणारे बरेच पंडित होते, पण त्यांचा भर

एखादा अभंग घेऊन त्यावर थोडक्यात निरूपण करायचे यावर असे.

‘साप्ताहिक सकाळ’साठी तुकोबांवर लिहिणार का, अशी मला डुंबरे यांनी विचारणा केली, तेव्हा ‘नाही’ म्हणायचे मला काहीच कारण नव्हते. रूढ पद्धतीविषयी मी नाराज होतोच, पण नेमके काय करायला हवे हे निश्चित होत नव्हते. डुंबरेंनी माझे महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासावरील स्फुटलेखन वाचले होतेच. संतसाहित्याचा अभ्यास आणि महाराष्ट्रावरील लेखन यांचा मेळ घालून मी तुकोबांविषयी लिहू शकेन, असे त्यांना वाटत  होते.  त्यांनी दिलेली ‘हिंट’ माझ्यासाठी पुरेशी होती. ‘ज्ञानेश्वरी आणि विसावे शतक’ या संपादनासाठी मी ‘विसाव्या शतकाची पाश्र्वभूमी’ हा लेख लिहिला होता. त्यात विशेषत: एकोणिसाव्या शतकाची चर्चा होती. महात्मा फुले यांच्या निधन शताब्दीच्या दरम्यान झालेल्या चर्चेत मी फुल्यांवरील तुकोबांचा प्रभाव तसेच वारकरी संप्रदाय व सत्यशोधक समाज यांच्यातील अनुबंध या विषयांवरील वेगवेगळे संशोधन मांडले होते. तोच विचार पुढे नेला तर तुकोबांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची वेगळी मांडणी करता येईल, हे माझ्या लक्षात आले. साहजिकच मी या प्रस्तावाला

मान्यता दिली.

ठरल्याप्रमाणे लेखमाला सुरू झाली व ती अडीच वर्षे चालली. लेखमाला लिहीत असताना तिच्याबद्दल चर्चा होत होतीच. नंतर अहमदनगर येथील ‘गाज प्रकाशन’ने तिचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याचीही खूप चर्चा झाली. त्या वर्षीचे साहित्य अकादमीसह मानाचे बहुतेक सर्व पुरस्कार या ग्रंथाला मिळाले; पण मुद्दा पुरस्कारांचा नाही. संतसाहित्याच्या अभ्यासाची पारंपरिक चौकट मोडून एका नव्या ‘पॅरेडाईम’ची निर्मिती करण्यात मी यशस्वी झालो याला अधिक महत्त्व आहे. याच दरम्यान, कविवर्य दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक लिहून तुकोबा हे पहिले आधुनिक मराठी महाकवी असल्याचे व तुकोबांच्या कवितेशिवाय आपण कविता या वाङ्मय प्रकाराचीच कल्पना करू शकत नसल्याचे विधान केले होते. तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून मराठी समीक्षेची मांडणी व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले होते. मी तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून मराठी संस्कृतीच्याच इतिहासाची पुनर्माडणी केली. तुकोबा हे महाराष्ट्राचे संस्कृतिपुरुष असल्याचे दाखवून दिले. एखाद्या संस्कृतीवर खरोखरच अशा पुरुषाचा इतका प्रभाव असेल तर त्या संस्कृतीतील सर्व चर्चा, घडामोडी, संघर्ष इत्यादी गोष्टी त्याच्यात प्रतिबिंबित होत असतात. मराठी संस्कृतीच्या या तुकारामकेंद्रित अभ्यासाला समोर ठेवून त्याप्रमाणे इतर संस्कृतींचाही अभ्यास करता यावा असा हा एक नवा नमुनाच तयार झाला. अर्थात, त्या संस्कृतीमध्ये तेवढय़ा प्रभावी व्यक्तित्वाचा माणूस मात्र असायला हवा. तो असेल तर त्याला अनुकूल, प्रतिकूल किंवा तटस्थ प्रतिसाद देणे समकालीन आणि उत्तरकालीनांना भाग पडते. त्यांच्या या प्रतिसादातूनच त्या संस्कृतीचा जो नवा इतिहास सिद्ध होतो त्यातील काही गोष्टी पारंपरिक इतिहास लेखनाच्या कक्षेतच आलेल्या नसतात. तसेच काही गोष्टींची पारंपरिक इतिहासातील प्रचलित स्पष्टीकरणापेक्षा वेगळी स्पष्टीकरणे उपलब्ध होतात, नवे अन्वयार्थ सुचतात.

‘तुकाराम दर्शन’ ग्रंथाचा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेला प्रकाशन सोहळा हाही चर्चेचाच विषय ठरला. प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पुढाकार घेऊन त्याची आखणी केली होती. कार्यक्रमास

य. दि. फडके, राम बापट, दिलीप चित्रे, सदा डुंबरे असे मान्यवर उपस्थित होते. ‘ग्रंथाला पुरस्कार मिळतील, पण त्यावर फार चर्चा होणार नाही.’ असे भाकीत य.दि. यांनी केले ते अगदी बरोबर ठरले. अशा ग्रंथांवर चर्चा केली तर काही तरी जबाबदारी अंगावर येते, ती घ्यायची अभ्यासकांचीही तयारी नसते.

दिलीप चित्रे आणि मी मिळून तुकाराम चर्चेचा ‘डिस्कोर्स’ एका उंचीवर नेला होता. त्यातून तुकोबांचा प्रभाव लक्षात आल्यामुळे त्याचा उपयोग आपल्या संकुचित जातीय उद्दिष्टांसाठी करता येईल हे हेरून काही धूर्त अभ्यासकांनी तसे प्रयत्न केले. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आले, पण हे अनपेक्षितही नव्हते. कार्ल पॉपर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे तुम्ही एखादा सिद्धान्त मांडल्यानंतर त्याच्यावर तुमचे नियंत्रण राहात नाही. त्यातून काय निष्कर्ष काढायचे, त्याचा कसा विस्तार करायचा, त्याला कसे वाकवायचे हे त्याचे महत्त्व उमगलेल्या कोणासही करता येते, पण त्यामुळे एका अर्थाने तुम्ही मांडलेल्या सिद्धान्ताचे महत्त्वही आपोआपच सिद्ध होत असते. हा एक प्रकारचा ‘सिद्धान्तविजय’च असतो.

यात महत्त्वाचा मुद्दा, पारंपरिक आणि आधुनिक असे दोन प्रकारचे प्रवाह मी रिचवू, पचवू शकलो. याचे श्रेय माझ्या बालपणी माझ्या अभ्यासाची पायाभरणी ज्यांनी केली त्या माझ्या वडिलांकडे- श्रीधरअण्णांकडे जाते. खरे तर मी जे केले ते त्यांनाही करता आले असते; पण व्यक्त होण्यापेक्षा चिंतनात गढून जाणे त्यांना अधिक आवडायचे. त्यामुळे त्यांनी लिहिले खूप कमी. त्यांच्या ग्रंथसंग्रहाचा, त्यांच्याकडे येणाऱ्या विद्वानांच्या चर्चेचा, त्यांनी घेतलेल्या विविध क्षेत्रांतील अनुभवांचा फायदा मला मिळाला. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला वैचारिक स्वातंत्र्य दिले. ‘तुला हवं तिकडं जा, पाहिजे ते कर; पण आपली मूळ बैठक सोडायचे कारण नाही.’ हे त्यांनी दिलेले सूत्र मनात ठेवूनच मी काम करीत राहिलो. ती बैठक किती पक्की आहे, याचा प्रत्यय मला पावलोपावली येत राहिला. तेव्हा हे श्रेय त्यांचेच.

‘तुकाराम दर्शन’च्या संदर्भात आणखी दोन गोष्टींचा उल्लेख करायला हवा. माझे संशोधन अगदी पहिल्यापासून आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे राहिले आहे. तत्त्ववेत्त्यांसाठी विशेषीकरण हे आत्मघातकी पातक आहे, हे विधान वाचण्यात येण्यापूर्वीच मी आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा पुरस्कर्ता होतो. मला आठवते, की ‘तुकाराम दर्शन’ लेखमाला सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस वाचक गोंधळात पडले होते. मी नेमके काय करतोय, हे सुरुवातीला तरी बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नव्हते. ज्ञानेश्वर किंवा तुकाराम यांच्याविषयीचे विवेचन चालू असताना अनपेक्षितपणे येणारे मार्क्‍स किंवा आंबेडकर यांचे संदर्भ कशासाठी, असे त्यांना वाटत असणार; पण हळूहळू हे लेखनच वेगळय़ा प्रकारचे असून, त्याच्यातील विविधतेमध्ये एक आंतरिक संगती असल्याचे लक्षात येऊ लागले. आमचा आधुनिक इतिहास पूर्वीच्या इतिहासापासून फारकत घेऊन घडत गेला नसून, आपली आधुनिकता हीच मुळी परंपरेतून विकसित झालेली आहे. एकोणिसाव्या शतकातील मराठी विचारवंतांना तुकोबा हा परंपरेकडून आधुनिकतेकडे नेणारा सेतू वाटला. ही गोष्ट अलीकडच्या अभ्यासकांना समजत नसेल तर तो त्यांच्या खंडित अभ्यास क्षेत्राचा व संकुचित दृष्टिकोनाचा दोष आहे. आधुनिक शास्त्रांचे अभ्यासक संतसाहित्य कालबाहय़ व अनावश्यक समजून त्याच्याकडे वळत नाहीत व पारंपरिक सांप्रदायिकांना तर आधुनिकता म्हणजे त्यांच्या परमार्थाच्या मार्गातील धोंड वाटते.

दुसरी गोष्ट अशी, की मला जो विषय मांडायचा होता तो इतिहासलेखनाच्या नेहमीच्या रूढ किंवा प्रचलित पद्धतीने मांडता येणारच नव्हता. नेहमीची पद्धत कालानुक्रमे लिहिण्यावर भर देते. माझ्या विषयाची गरज अशी होती, की माझा पहिला मुद्दा पूर्वकाळाशी संबद्ध असेल, तर दुसरा आधुनिक काळाशी आणि तिसरा परत पूर्वकाळाशी. मध्येच एखादा समकालीन संदर्भसुद्धा अवतीर्ण होई. कधीकधी या सर्व घटना जणू काही एकाच वेळी घडत आहेत की काय असा भास होई. हा सारा प्रकार वाचकांच्या गळी उतरवायचा असेल तर त्यासाठी त्यांना विश्वासात घ्यायला हवे, पण मग लिखाणाची शैलीही रूक्ष असता कामा नये.

सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘तुकाराम दर्शन’ लिहिता लिहिताच मला पुढचा प्रकल्प सापडला. त्यामुळे माझी दिशा योग्य असल्याचे आपोआपच सिद्ध झाले. तो प्रकल्प म्हणजे  ‘लोकमान्य ते महात्मा’. विसाव्या शतकातले महाराष्ट्रीय राजकारणी टिळकांच्या मागे जायचे की गांधीजींच्या या पेचात पडले. ही चर्चा चालू असताना टिळक पक्षाचे लोक टिळकांची तुलना रामदासांशी आणि गांधीजींची तुलना तुकोबांशी करू लागले. रामदास-तुकाराम हे पूर्वीचे द्वंद्व आता टिळक-गांधी द्वंद्वाच्या रूपात प्रगट होऊ लागले; पण माझी पद्धतिशास्त्रीय निष्पत्ती आणखी वेगळीच होती. तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अन्वयार्थ लावताना टिळकयुगाच्या समाप्तीपर्यंत काही अडचण येत नाही, पण त्यानंतर हा इतिहास एककेंद्रीय वर्तुळ न राहता द्विकेंद्री लंबवर्तुळाचा आकार धारण करते. टिळक आणि गांधी ही ती दोन केंद्रे होत.

‘तुकाराम दर्शन’ लिहिण्याविषयी मला डुंबरे यांनी सांगितलं होतं आता ‘लोकमान्य ते महात्मा’चा प्रकल्प मीच त्यांच्यापुढे मांडला. त्यांना तो पटला आणि माझी दुसरी लेखमाला याच साप्ताहिकातून सुरू झाली. ही लेखमाला पहिलीच्या दुप्पट, म्हणजे पाच वर्षे चालली. तिचा द्विखंडात्मक ग्रंथ झाला. ‘तुकाराम दर्शन’ आणि ‘लोकमान्य ते महात्मा’ हे दोन ग्रंथ अनुक्रमे तुकाराम आणि टिळक-गांधींविषयी जितके आहेत, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक ते महाराष्ट्राबद्दलचे आहेत.

दुसरे असे, की इतिहासलेखनात महानायक (किंवा) महापुरुषकेंद्रित आणि जन(सामान्य)केंद्रित असे प्रकार रूढ आहेत. जनकेंद्रित इतिहासाचे आणखी पुढचे रूप म्हणजे वंचितकेंद्रित इतिहास. माझ्या लेखनात हे भेद आढळणार नाहीत. नेता आणि त्याचे अनुयायी यांच्यातील द्वंद्वात्मकतेकडे झुकू पाहणाऱ्या आंतरक्रियेची मी दखल घेत असतो. याशिवाय महानायक आणि जनसामान्य यांच्यातील दुवा जोडणारे असंख्य लहान-मोठे नायक अस्तित्वात असतात. त्यांचीही दखल मी घेत असतो. इतिहास ही महानायक, नायक आणि अनुभवी जन यांच्या परस्परप्रभावातून घडत जाणारी एक अखंड प्रक्रिया असते, याचे भान ठेवूनच मी लिहीत आलो आहे. इतिहासाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन समग्रतावादी आहे. नेते किंवा अनुयायी असलेल्या व्यक्तींच्या बरोबरीने संस्था, संघटना यांच्यासारख्या यंत्रणा आणि त्यांनी चालवलेल्या चळवळी यांची चर्चा माझ्यासाठी अपरिहार्य असते. व्यक्तींच्या कृती आणि त्यामागची त्यांची वैचारिक भूमिका तसेच ज्या परिस्थितीत त्या कृती करतात त्या परिस्थितीतून त्यांना लागणारी अनुकूलता अथवा प्रतिकूलता. अनुकूलतेचा करून घेतलेला उपयोग आणि प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी केलेली धडपड या सर्व गोष्टींचा ऊहापोह करणे मी आवश्यक मानतो. इतकेच काय, परिस्थितीतील अज्ञात व अनिश्चित घटकांना (गीतेच्या भाषेत ‘दैव’) सुद्धा विचारात घ्यावे लागते. याचे सूत्र तुकोबांच्या अभंगात सापडते असे सांगितले तर आश्चर्य वाटू नये.

‘‘तुका म्हणे आपुले बळ। युक्ती काळ कारण।।’’

 

डॉ. सदानंद मोरे

sadanand.more@rediff.com