चैतन्य प्रेम

सद्गुरूंची कृपा हाती आली की भक्तीचं भांडार उघडतं, असं म्हटलं आहे. आता हे हाती चढणं म्हणजे काय हो? अंगात कसं विष चढायला लागतं ना, तसं हे भक्तीकृपेचं अमृत अंगात चढायला लागतं, भिनायला लागतं! मग भक्तीचं भांडारच उघडतं. म्हणजे अनंत भक्तांच्या चरित्रातून सहज बोध सुरू होतो. ही चरित्रं आपण पूर्वीही वाचली असतात, पण त्यांचा खरा रोख लक्षातच आला नसतो. सुदाम्याची कथा आपण कशी वाचली असते? तर भगवंताची भक्ती केली तर झोपडीचा सुद्धा महाल होतो! म्हणजे महाल होण्याचं महत्त्वच डोक्यात असतं आणि त्यासाठी भक्तीची गरज वाटते! काय सुंदर कथा आहे ती! सुदाम्याचं जीवन म्हणजे अखंड संघर्ष आणि गरिबी. अर्थात त्या संघर्षांचा त्याला वीट नव्हता. बायको आणि मुलाबाळांचं पालनपोषण तो कर्तव्यबुद्धीनंच करीत होता. एक गोष्ट मात्र तो त्याच्याही नकळत सदोदित मोठय़ा आवडीनं करत होता, ती म्हणजे कृष्णस्मरण! गुरुगृही अध्ययनासाठी तो होता तेव्हा श्रीकृष्ण त्याचा सहाध्यायी होता. पण तेव्हाही त्यानं कृष्णाला कधी आपल्या बरोबरीचं मानलं नाही. तो श्रेष्ठ आहे, साक्षात परमेश्वर आहे, हाच भाव होता. त्याच्या बरोबरचे ते दिवस, त्या दिवसांतील कृष्णाच्या लीला, त्याचं सहज मधुर बोलणं त्याच्या चित्तात सदोदित ठसलं होतं. बायकोलाही कृष्ण माहीत होता, तो पतीचा बालमित्र म्हणून. आता त्याच्या पराक्रमाच्या आणि ऐश्वर्याच्या कथा तिच्या कानावर येत होत्या. त्यामुळेच ती सदोदित हट्ट करू लागली, की ‘‘तुमचा एवढा बालमित्र म्हणवतो, तर मग तुमचं दारिद्रय़ दूर का करीत नाही? जा एकदा त्याच्याकडे आणि मागा काहीतरी!’’ सुदाम्याला काही मागण्याची इच्छा तीळमात्र नव्हती. पण पत्नीच्या बोलण्यानं कृष्णभेटीची आस मनात बळावली. त्यानं जायचं ठरवलं. घरात होतंच काय की ते कृष्णाला अर्पण करावं? त्यानं पुरचुंडीभर पोहे घेतले आणि निघाला. मजल दरमजल करीत कृष्णाच्या राजप्रासादापाशी पोहोचला तेव्हा त्याला द्वारपालांनी अडवलं. त्यानं निरोप पाठवला की, ‘‘गुरुगृहात प्रभुंसह काही काळ ज्यानं घालवला आहे तो सुदामा आला आहे. प्रभुंची इच्छा असेल तर त्यांची भेट घेण्यात त्याला आनंद आहे. नाहीतर या उंबरठय़ावर डोकं टेकवून तो आनंदानं परत जाईल!’’ प्रभु स्वत: धावत आले. सुदाम्याला गळामिठी घातली आणि आत नेऊन आसनावर बसवलं. रुक्मिणीबरोबर सुदाम्याची पाद्यपूजा केली. दोन-चार दिवस कसे आनंदात गेले. मग सुदाम्याला वाटलं, आता परतायला हवं. कृष्णानं विचारलं, ‘‘सांग मी तुला काय देऊ?’’ सुदामा काय मागणार? तो म्हणाला, ‘‘या जन्मात तुझी भेट घडली यापेक्षा कशाला महत्त्व का आहे? माझी पात्रता नसताना ती भेट घडली अजून काय मागावं? मला काही नको. काही द्यायचंच असेल, तर तुझ्याकडे कधी काही मागण्याची इच्छाही होऊ नये, अशी कृपा कर!’’ प्रभु हसले, पण अंतरंगात हेलावले. सुदामा परत आला तेव्हा त्याच्या झोपडीचा महाल झाला होता. पण त्याचं त्याला काय देणं-घेणं होतं? तो झोपडीतही तर राजासारखाच रहात होता! या महालाचं त्याला अप्रूप वाटलं नाही. अप्रूप वाटलं ते त्या काळी त्याच्या पत्नीला आणि इतकी युगं उलटूनही अप्रूप वाटतं ते आम्हाला! कारण आम्हाला महालाचंच प्रेम असतं. ‘काही मागायची इच्छाच मनात येऊ देऊ नकोस,’ या विराट मागण्याचं महत्त्व कळू लागतं ते सद्गुरूकृपा हाती चढू लागली की नंतरच!