चैतन्य प्रेम विषयसुखाची ओढ हेच बंधन आहे आणि वृत्ती निर्विषय होणं हीच मुक्त अवस्था आहे. आता शब्दार्थानं हे वाक्य कळतं, पण ते खऱ्या भावार्थानं उमगणं महत्त्वाचं आहे. विषय म्हणजे लैंगिक कामभाव असंच वाटतं, पण तेवढाच अर्थ नाही. विषयसुख म्हणजे इंद्रियांद्वारे मनाला सदैव सुखावणाऱ्या गोष्टींचा भोग घेण्याची धडपड. डोळ्यांद्वारे पाहिलं जातं म्हणून पाहाणं हा डोळे या इंद्रियाचा विषय झाला. स्पर्श हा त्वचेचा विषय झाला, ऐकणं हा कर्णेद्रियांचा विषय झाला, वास घेणं हा घ्राणेंद्रियांचा विषय झाला, स्वाद घेणं हा जिव्हेंद्रियाचा विषय झाला. तर अशा प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक विषयानं आपण बहिर्मुख होऊन, बाह्य़ जगातून आंतरिक सुख भोगू पाहात असतो. कामभावनेत सर्व इंद्रियं जणू एकरूप होतात आणि त्यामुळे विषयसुख म्हणजे लैंगिक सुख, असंच वाटतं. पण ते पूर्णसत्य नव्हे. बाहेरच्या जगातील वस्तू आणि व्यक्तींच्याच आधारावर सुख मिळेल, या भावनेनं आपण बाह्य़ गोष्टींवर अवलंबू लागतो. बाह्य़ जगातली प्रत्येक गोष्ट क्षणोक्षणी बदलणारी, अशाश्वत आणि नश्वर आहे. त्यामुळे तिच्या आधारावर मिळणारं सुखही अशाश्वत आणि नश्वरच आहे. खरं पाहता, सुख कारणावर अवलंबून असलं तरी जेव्हा आपण सुखासाठी कारणावर अवलंबू लागतो तेव्हाच खरी अडचण निर्माण होते! आपलं खरं लक्ष सुखाकडे नसतं, ज्यायोगे सुख मिळत आहे, असं आपल्याला वाटतं ते कारण टिकावं, सदैव आपल्याला अनुकूलच असावं, याकडेच आपलं अधिक लक्ष असतं. जीवन अशाश्वत आहे, पण असेना का! निरपेक्ष प्रेम, सहृदयता, सहवेदना, आत्मीयता या शाश्वत भावनाही त्याच जीवनात शिकता येतात ना? भले पती-पत्नीमधल्या प्रेमात प्रथम देहसुखाचा भाग प्रधान असेल, तरीही त्या नात्यातही देहभाव क्षीण होत खरा प्रेमभाव निर्माण होत जातोच ना? हाच प्रेमभाव नंतर उभयतांना जीवनातीलही परम शाश्वत तत्त्वाकडे वळवता येतोच ना? या सकारात्मक बाजूऐवजी आपण केवळ सुखप्राप्तीच्या साधनांच्या नकारात्मक चिंतेत गुरफटतो. स्वार्थ, द्वेष, मत्सर, अहंकार, आसक्ती, मोह, दुराग्रह यांच्याही जोरावर ‘प्रेम’ मिळवू आणि टिकवू पाहतो, ‘सुखी’ होऊ पाहातो. ज्या आधारावर प्रेम मिळालं, तो आधार कोणत्याही कारणानं अंतरला तरी तोवर जो प्रेमानुभव मिळाला त्याची तृप्ती का टिकत नाही? का आपण खचून जातो, निराश, उद्ध्वस्त होतो? कपोताची तशीच तर दशा झाली होती. जीवनात अमाप प्रेमसुख मिळूनही तो अतृप्तच राहिला होता आणि म्हणूनच त्या प्रेमसुखाचा आधार तुटताच त्याला जीवनच निर्थक वाटू लागलं! वियोगाचं दु:ख अवश्य व्हावं. ते माणूसपणाचंच लक्षण आहे. ज्या आधारावर प्रेम अनुभवलं त्या आधाराप्रति जन्मभर कृतज्ञभावही असावा. तेसुद्धा माणूसपणाशी सुसंगत आहे, पण त्याउलट जीवन निर्थक वाटणं, जगण्याची हेळसांड होणं, आयुष्याची संधी मातीमोल वाटणं, हे गैर आहे. जे परावलंबी करतं त्याला मग प्रेम तरी कसं म्हणावं? प्रेमानं माणूस उन्नत झाला पाहिजे, अवनत नव्हे! पण कपोताप्रमाणे प्रेमाधार तुटताच आपणही उन्मळून पडतो, कारण जीवनाची अशाश्वतता आणि त्या अशाश्वत जीवनातही जे शाश्वत आहे, त्याचं मोलच आपल्याला उमगलं नसतं! कपोताच्या निमित्तानं अवधूत त्याकडेच लक्ष वेधत आहे.