– चैतन्य प्रेम

आपलं हे चिंतन वाचताना एक गोष्ट नीट लक्षात घ्या. इथे कामासक्तीला विरोध आहे, कामभावनेला नव्हे. कामभावना ही प्रथम निव्वळ देहाशी जखडलेली भासत असली तरी प्रेमभावनेशिवाय तिला पूर्णत्व नाही. उलट गृहस्थजीवनात ती जसजशी परिपक्व होत जाते तसतसं प्रेम, कारुण्य, वात्सल्य, सहसंवेदनशीलता यांची जोड तिला मिळू लागते. कालांतरानं याच भावना अधिक पुष्ट होतात. तेव्हा अन्य भावनांप्रमाणेच काम ही साधी भावना आहे. पण या भावनेत अशीही विपरीत शक्ती आहे, की ती माणसातलं पशुत्व वेगानं प्रकट करू शकते. जो समाज कामभावनेच्या स्वातंत्र्याचा उच्चरवानं पुरस्कार करतो त्या समाजालाही हे पशुत्व मान्य नाही! कारण त्या पशुत्वानं दुसऱ्याच्या मनुष्यत्वावर, त्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होऊ शकतं. तेव्हा ही भावना स्वाभाविक असली तरी तिची अनिर्बंध अभिव्यक्ती समाजानं केलेल्या कायद्यालाही अमान्य आहे. जो अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करू इच्छितो त्याला तर या कामभावनेला सामोरं कसं जावं, या आंतरिक संघर्षांचा सामना करावाच लागतो. तो जर गृहस्थाश्रमी असेल, तर स्वस्त्रीशी एकनिष्ठ राहणं हे ब्रह्मचर्यच आहे, असं सत्पुरुषांनीही म्हटलं आहे. पण साधक हा विवाहित असो वा अविवाहित असो; त्याला आपण कामभावनेचे गुलाम होऊ नये, असं प्रामाणिकपणे वाटत असतं. त्यावर अनेक संतांप्रमाणेच एकनाथ महाराजही सांगतात की, ‘‘भावें हरीसी रिघाल्या शरण। हृदयीं प्रकटे नारायण। तेव्हां सर्व काम सहजें जाण। जाती पळोन हृदयस्थ।।१९१।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय २६ वा). हरीला संपूर्ण भावनापूर्वक शरण गेलो तर हृदयात नारायण प्रकटतो मग त्या हृदयातून सर्व कामनांप्रमाणेच कामभावनाही ओसरू लागते. आता हृदयात नारायण प्रकटतो म्हणजे आपल्या अंत:करणातील देवत्व आणि दिव्यत्व प्रकटतं! पण हा बराच लांबचा पल्ला आहे, हे गेल्या भागातच सांगितलं. त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे ‘हरी’चं होऊन जाण्याचा अभ्यास करणं आणि त्या ‘हरी’च्या बोधानुसार जगू लागणं, हाच आहे. हा ‘हरी’ किंवा ‘नारायण’ कोण आहे? तर ‘हरी’ म्हणजे जो माझ्या समस्त भवदु:खाचं हरण करतो तो, ‘नारायण’ म्हणजे नरदेहरूपात, मनुष्यरूपात वावरत असलेला खरा सद्गुरू! इथे ‘खरा’ शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं. स्वत:ला सद्गुरू म्हणवून घेणारा आणि अध्यात्माचा बाजार मांडलेला कुणीही ‘हरी’ किंवा ‘नारायण’ नाही. कारण त्याच्यात देवभाव नव्हे, तर सुप्त देहभावच बळकट असतो. जो खरा सद्गुरू आहे तोच शिष्याच्या अंत:करणातील समस्त भावांना भगवंतकेंद्रित वळण लावण्याची दीर्घ प्रक्रिया सुरू करतो. त्याच्यातील माणुसकी जागवतो, सद्गुणांचं पोषण करतो, दुर्गुणांचा प्रभाव कमी करतो. शिष्याला मग स्वत:मधले विकार प्रथमच जाणवू लागतात. ते साधनेच्या आड येत आहेत, असं वाटू लागतं. त्या विकारांनाही भगवंताशी जोडण्याची कला सद्गुरूच शिकवू लागतो. ही प्रक्रिया तात्काळ साधणारी मात्र नसते.

chaitanyprem@gmail.com