– चैतन्य प्रेम

हृदयस्थ जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप होण्याची कला सद्गुरू शिकवतात. याचं कारण दृश्य जगात वावरत असतानाही ते परमात्म्याशी अखंड एकरूप असतात. व्यावहारिक जगातही, एखाद्याला संगीत शिकायचं असेल तर संगीततज्ज्ञाकडे जावं लागतं. पण जर खरं शास्त्रशुद्ध गायन वा वादन आत्मसात करायचं असेल, तर जो स्वत: स्वरसाधनेत सदैव एकरूप आहे अशापाशीच जाऊन खरा लाभ आहे. मला गणित शिकायचं असेल, तर जो खरा गणितज्ज्ञ आहे त्याच्यापाशीच मला गेलं पाहिजे. अगदी तसंच जर हृदयस्थ परमात्म्याशी ऐक्य घडावं, असं वाटत असेल, तर खऱ्या सद्गुरूपाशीच गेलं पाहिजे. आता असा काही हृदयस्थ परमात्मा आहे का, सद्गुरू ऐक्याची गरज आहे का, हे प्रश्न ज्याला ती तळमळ लागलेली नाही त्यालाच पडतील. त्याच्या हाती मग साधनेसंबंधी काही ग्रंथ पडला तरी तो वाचताना त्याच्या अंत:करणात काहीच बोध होणार नाही. पण जो या तळमळीत आहे त्याला अशा ग्रंथातूनही आधार मिळेल. त्याला ते शब्द अगदी जवळचे वाटतील. त्या शब्दांशी त्याचं नातं जडेल. जसं

‘सा ग म ध नी सां’ आणि ‘सां नी ध म ग सा’ ही अक्षरं वाचून सर्वसामान्य माणसाला काहीच बोध होणार नाही, पण हे मालकंस रागाचे आरोह-अवरोह आहेत, हे स्वरोपासकाला तात्काळ जाणवेल. इतकंच नाही त्याच्या अंत:करणात त्यांचा स्वराविष्कारही सुरू होईल. काही बंदिशी उलगडतील. तर त्याप्रमाणे जे सत्य पिंगलेच्या मनात शब्दरूपानं उमलू लागलं ते भावरूपानं हृदयाला भिडूही लागलं. तिच्या मनात आलं, ‘‘सांडूनि हृदयस्था अच्युतातें। वरावें वरा निर्दैवाते। तंव ते द्वैतभयें भयचकिते। काळग्रस्ते सर्वा।।२५१।। जे निजभयें सर्वदा दु:खी। ते भार्येसी काय करिती सुखी। अवघीं पडलीं काळमुखीं। न दिसे ये लोकीं सुखदाता।।२५२।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). हृदयस्थ परमात्म्याला सांडून दैवाधीन जगाला मी निवडलं. पण या जगात ज्यांना मी मोहासक्तीनं माझं मानलं ती माणसं काळाच्या पकडीत जगत आहेत. द्वैतभयानं भयचकित आहेत! काय नाथांची शब्दयोजना आहे पाहा! आधी द्वैताचं भय आहे आणि त्यात त्या भयानं चकित होणंही आहे!! द्वैताचं भय म्हणजे काय हो? अगदी अनुभवाचं आहे बरं आपल्या. द्वैत म्हणजे दोनपणा. अमुक करायला जावं, पण घडावं वेगळंच, हा अनुभव. सुखाला कवटाळावं आणि दु:खाच्याच कवेत सापडावं, हा अनुभव. तेव्हा जे मनात आहे तेच घडेल याची शाश्वती नसणं, हे द्वैतभय. आपल्या मुलानं आपल्याशी असं-असं वागावं, ही इच्छा आहे; पण तो तसं वागेल, याची खात्री नाही. बरं ती खात्री नाही आणि तो अगदी तसंच मनाविरुद्ध वागला तरी माणसाला जो धक्का बसतो ते भयचकित होणं आहे! आता खरं पाहता आपण अनपेक्षित, अविश्वसनीय घडलं तर चकित होतो. पण इथं एखाद्यानं विपरीत वागणं अनपेक्षित नसलं, तरी आपण भयचकित होतो, हा आपलाही अनुभव आहे बरं. तर द्वैतात वावरताना जग आपल्या स्वार्थाची पूर्ती करील या भ्रमात जगणारा प्रत्येक माणूस हा असा कमीअधिक प्रमाणात भयचकित असतो. तो मला सुखाची हमी काय देणार? जो स्वत:च भयानं व्याप्त आहे त्याचा आधार मला निर्भय करू शकत नाही. हे अवघं जगच काळाच्या मुखी आहे. ते मला निर्भय, नि:शंक, निश्चिंत करू शकत नाही. माणसाच्या आधाराची ही कथा, मग ‘देवा’चा आधार तरी सबळ आहे का हो?