बुजुर्गांनी निवडणूक लढवायला नको असा सल्ला निवडणुकीपूर्वी देणाऱ्या अमरावतीतून जिंकलेल्या नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचे निश्चितच आशिर्वाद घेऊ असे सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणा म्हणाल्या की, आनंदराव अडसूळ माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तर नक्कीच मी अडसूळ आजोबांचे आशिर्वाद घ्यायला त्यांच्या घरी जाईन. अमरावतीमधून स्वाभिमानी आघाडीतर्फे लढताना नवनीत राणा यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघात शिवसेनेकडून गेल्या निवडणुकीत राणा यांचा पराभव केलेल्या आनंदराव अडसूळ यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा ३६,२९५ मतांनी पराभव केला आहे. राणा यांना ५,०७,८४४ मते मिळाली आहेत तर अडसूळ यांना ४,७०,५४९ मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचून न जाता मी मेहनत केल्याचे व त्याचे फळ मिळाल्याचे राणा म्हणाल्या. माझी लढाई अडसूळ यांच्याशी नव्हतीच तर नरेंद्र मोदींशी होती असे त्या म्हणाल्या. अडसूळांना जी काही मतं मिळाली ती मोदींमुळे असा दावा त्यांनी केला आहे. आपल्या मतदारसंघात महिला व युवकांवर लक्ष केंद्रीत केलं, त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला याचं फळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. २०१४ मध्ये मी महिलांपर्यंत पोचले नव्हते, त्यामुळे मोदीलाटेचा आपल्याला फटका बसला होता, यावेळी ती कसर भरून काढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच यंदाच्या त्सुनामीमध्येही महिलांनी व युवकांनी आपल्याला साथ दिल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीमध्ये खासदार म्हणून काम करताना नरेंद्र मोदींच्या सरकारला मदत करणार का यावर मतदारांचं मत काय आहे ते बघून त्याप्रमाणे काम करू असंही त्यांनी सांगितलं आहे.