यंत्रमाग व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. निवडणुका संपल्यानंतर यंत्रमागाच्या वीजपुरवठय़ासाठी २७ एचपीपर्यंत मिळणारे अनुदान ४० एचपीपर्यंत वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडीत दिले. भिवंडीतील टोरेंट कंपनीकडून कोणावरही अन्याय सहन केला जाणार नसून त्यासाठी विशेष बैठक घेऊन नागरिकांना दिलासा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.

ते म्हणाले, काही यंत्रमाग व्यावसायिकांनी माझी भेट घेऊन यंत्रमागावरील वीज अनुदानाची मागणी केली आहे. सध्या आचारसंहिता असल्यामुळे मी घोषणा करणार नाही. मात्र, निवडणूक आटोपल्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शहरातील नागरिकांना टोरेंटकडून त्रास होत आहे; पण ज्यांनी टोरेंट आणले, तेच आता शिव्या देत आहेत, असा टोलाही लगावला.

खासदार कपिल पाटील यांनी पाच वर्षांत २८ हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघासाठी आणला. शहरात काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल, पिण्याच्या पाण्यासाठी योजना, राष्ट्रीय महामार्ग असे प्रकल्प सुरू आहेत; पण यापूर्वीच्या खासदारांनी एक तरी काम दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेसकडून गरिबी हटावची घोषणा करण्यात आली. मात्र, केवळ चेले-चपाटय़ांचीच गरिबी काँग्रेसने हटविली. त्या वेळी ७२ पैसेही वाटले नाहीत. तर आता ७२ हजार रुपये काय देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.