भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मोठा हिंसाचार झाला. कॉलेज स्ट्रीट मार्गावर कोलकात्ता विद्यापीठाजवळून अमित शाह यांचा रोड शो जात असताना भाजपा आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते भिडले. दरम्यान अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच हा हल्ला केला असा आरोप केला आहे. टीएमसीचे गुंड भाजपाला रोखू शकत नाहीत असं सांगताना यासंबंधी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘भाजपाच्या रोड शोला कोलकातामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास प्रत्येक नागरिक या रोड शोसाठी उपस्थित होता. तृणमूल काँग्रेसचे गुंड हे पाहून चिडले आणि हल्ला केला. मला काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे ज्यांनी इतका गोंधळ होऊनही रोड शो सुरु ठेवला आणि नियोजनाप्रमाणे ठरल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी संपवला’, असं अमित शाह यांनी सांगितलं.

‘ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून होत असलेल्या हिंसाचाराचा मी निषेध करतो. मला बंगालमधील जनतेला आवाहन करायचं आहे की, शेवटच्या टप्प्यात तुमच्या मतांच्या आधारे हा हिंसाचार संपवून टाका. राज्यातील हिंसाचार संपवायचा असेल तर टीएमसीला बाजूला करणं गरजेचं आहे’, असंही त्यांनी म्हटलं.

पोलीस आणि सरकारच्या इशाऱ्यावर हिंसाचार होत असल्याचा आरोप करताना फक्त बंगालमधील बाजपाच्या कार्यक्रमात हिंसाचार का झाला ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपा २३ हून जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.