बीडमध्ये भाजपाची दहशत, दादासाहेब मुंडेंना मारहाण करणाऱ्यांना अटक करा-धनंजय मुंडेनिवडणुकीपूर्वीच पराभव होणार हे ठाऊक असल्यानेच भाजपा कार्यकर्त्यांच्या पायाखाली वाळू घसरत चालली आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने दादासाहेब मुंडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या गुंडाना अटक करा आणि तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला म्हणुन दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याला आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. लोकशाही आहे का सत्ताधारी पक्षाची हुकूमशाही ? असा सवाल उपस्थित करून लोकशाही प्रक्रियेत आक्षेपही नोंदवायचा नाही का ? सत्ताधारी भाजपाचे गुंड अशा प्रकारे दहशत करणारे असतील तर निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका कशा होतील ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. दादासाहेब मुंडे यांना उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणुन झालेल्या मारहाणीची घटना अतिशय गंभीर आहे, या संदर्भात आपण निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, मारहाण करणार्या गुंडांना तातडीने अटक करा, संपुर्ण निवडणुक प्रक्रिया होईपर्यंत त्यांना तडीपार करा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. मारहाणीची घटना घडली तेव्हा पोलीस बघ्याची भूमिकेत का होते? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असून, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आपण निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.