Akhilesh Yadav : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ७२ वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. बंगालमध्ये नरेंद्र मोदींनी केलेलं भाषण अत्यंत लाजिरवाणं असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून यासंबंधी बोलत असताना अखिलेश यादव यांनी मोदींवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने नुकतंच काही नेत्यांवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ७२ तासांसाठी बंदी घातली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दोघांनाही ७२ तासांसाठी प्रचारापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे.

‘विकास विचारत आहे….तुम्ही पंतप्रधानांचं लाजिरवाणं भाषण ऐकलंत का ? १२५ कोटी भारतीयांचा विश्वास गमावल्यानंतर आता ४० आमदार संपर्कात आहेत अशा खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत’, असं ट्विट त्यांनी केलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘यातून नरेंद्र मोदींची पैशांची मानसिकता दिसत आहे. त्यांच्यावर ७२ तास नाही तर ७२ वर्षांसाठी बंदी घातली पाहिजे’.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. ममतादीदी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचे आमदारही तुम्हाला सोडून जातील. सध्या तुमचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत, पण भाजपा निवडणूक जिंकण्याचा अवकाश तुमचे सर्व आमदार तुम्हाला सोडून येतील. तुमच्या पायाखालचे राजकीय मैदान सरकू लागले आहे, असा टोला मोदींनी लगावला होता.