नामदेव कुंभार, जालना

रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदारसंघ राज्य पातळीवर चर्चेत आला होता. पण खोतकरांचे बंड शमले आणि दानवेंचा रस्ता मोकळा झाल्याचे बोलले गेले. मात्र, भीषण पाणीटंचाई, वादग्रस्त वक्तव्य, शिवसेना कार्यकर्त्यामधील नाराजी आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यामुळे जालना मतदार संघामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २३ तारखेला जालना मतदार संघातील मतदान होणार आहे. रावसाहेब दानवे पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. दानवे यांनी २०१४ मध्ये औतडेंचा दोन लाखांपेक्षा आधिक मतांनी पराभव केला होता. मात्र, यावेळचे गणित थोडं वेगळं असू शकते. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागातील मतदारराजा नाराज आहे. पैठणमधील ११ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे तर तब्बल ४० गावांत पुढाऱ्यांना प्रचारासाठी मनाई आहे. तर दानवे यांच्या भोकरदनमध्ये टँकरने पाणी सुरू आहे. उन्हाळ्याच्या झळा आणखी किती दिवस असणार हे माहित नाही. त्यापूर्वीच ही परिस्थिती असल्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे.

लोकसभेच्या जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तीन मतदारसंघात एकूण ९ लाख २२ हजार २५ मतदार आहेत. तर जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत ९ लाख २१ हजार १०६ मतदार आहेत. त्यामुळे औरंगाबादकर काय कल देतात त्यावर जालना मतदार संघाचा निकाल अवलंबून आहे. त्याशिवाय खोतकरांचे बंड शमले असले तरीही शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे त्या मतांचा फटका दानवेंना बसण्याची शक्यता आहे.

विकासकामाचा मुद्दा –
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून0 खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र, स्थानिकांच्या बेरोजगारी आणि पाणी प्रश्नाशिवाय रस्ते या मुद्द्यांच्या आधारे विरोधी पक्ष प्रचार करत आहेत. तब्बल २० वर्षे दानवे यांनी जालन्यात आपले वर्चस्व राखले आहे. मात्र, स्थानिकाच्या मते जालन्याचा हवा तसा विकास झाला नाही. येथील बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. एमआयडीसी वगळता येथील तरूणांना उपजिविकेचे साधन उपलब्ध नाही. नोकरीसाठी येथील तरूण इतर शहारात पलायन करत असल्याचे चित्र आहे. २६ वर्षीय सुरज दबाडकर सांगतो, येथील तरूणांना रोजगारासाठी औरंदाबाद, नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागते. दानवे साहेबांना आम्ही चार वेळा खासदार केले. मात्र, इथला हवा तसा विकास झालेला दिसत नाही. तेच प्रश्न आवासून उभे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर शहराचा, शरद पवार यांनी बारामती, अशोक चव्हाण यांनी नांदेड आणि स्व. विलास देशमुखांनी लातूरचा जसा विकास केला तसा जालन्याचा का झाला नाही? असा प्रश्नही यावेळी त्याने उपस्थित केला.

नगरपरिषदेवर आघाडीचा झेंडा –
दानवेंच्या गड असलेल्या भोकरदन नगरपरिषदेवर तसेच जालना आणि परतूर नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. त्याच मतदार संघातील जाफ्राबाद नगरपरिषदेवर राष्ट्रवादी सत्तेत आहे. घनसांवगी विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या ठिकाणाचे मतदार काय कौल देतात यावरही दानवेंचे भवितव्य अवलंबून आहे.

भावनिकता निर्णायक ?
जालना मतदार संघात प्रचार कराताना रावसाहेब दानवे यांना उष्मघातामुळे रूग्णालयात दाखल व्हावे लागले. आठवडा उलटून गेला तरीही दानवे अद्याप रूग्णालयात उपचार घेत आहेत. भाजापातील दिग्गजांच्या एकाही सभेला दानवेंना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे जालनामधील मतदार भावनिक झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा दानवेंना होण्याची शक्याता आहे.

दिग्गजांच्या सभा –
२० वर्षांपासून जलना मतदार संघ भाजपासाठी गड मानला जातो. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि दानवेंच्या वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून या मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यात दानवेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे प्रचार हवा तसा झाला नाही. त्यामुळे भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा जालनामध्ये होणार आहेत. त्यामुळे गड मानल्या जाणाऱ्या मतदार संघामध्ये भाजपाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

दानवेंविरोधात बच्चू कडूंच्या सभा –
निवडणुकीच्या रणांगणात माघार घेणारे प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी जालन्यात दानवेंविरोधात शंख फुंकले आहेत. याठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या प्रचारार्थ आपल्या प्रचारसभांचे आयोजन केले आहे. बदनापूर, अंबड यासह महत्वाच्या ठिकाणी ते प्रचारसभा घेणार आहेत.

वंचितची मते जालन्यात निर्णायक –
जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव नसला तरीही त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. वंचितकडून डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ मध्ये वानखेडे हे बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढले होते. त्यांना त्यावेळी तिसऱ्या क्रमांकांची मते मिळाली होती. जालना मतदार संघात १२ टक्के मुस्लीमांची संख्या आहे. त्याशिवाय दलित मतदारामुळे वानखेडे जास्तीत जास्त मते घेऊ शकतात.

जावयाची भूमिका निर्णायक –
रावसाहेब दानवे यांचे जावाई हर्षवर्धन जाधव हे सिल्लोडमधील असून औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून रणगंणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सिल्लोड विधानसभा जालना लोकसभेत येतो. येथे हर्षवर्धन यांचा जनसंपर्क तडगडा मानला जातो. अब्दुल सत्तार यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दानवे यांना याचा फायदा होईल की फटका बसेल अशी संभ्रमाची स्थिती आहे.