मतदानाच्या वेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे मागणी केल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मतदानाच्या सगळ्या टप्प्यांमध्ये नियोजन आणि चांगली अंमलबजावणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाचं जयंत पाटील यांनीही अभिनंदनही केलं आहे.

आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते असे सांगतानाच लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्रॉंगरुमध्ये थेट आतमध्ये जाण्यासंबंधी दिल्या गेलेल्या परवानगीच्या निर्णयाबाबत आमचा आक्षेप असून याचा निषेध करत असल्याचेही आमदार जयंत पाटील म्हणाले. दरम्यान यावर तातडीने पुनर्विचार करुन उमेदवारांना या स्ट्रॉंगरुमध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली.

मुळात सीलबंद मशीन्स जवळ उमेदवाराला जाण्याचे कारण नसते. ईव्हीएम मशीनमधील डेटामध्ये दुरुस्ती करून मतदान प्रक्रियेत बदल केला जावू शकतो अशी शंका जनमानसामध्ये दाट ‌शकता आहे याबाबत विरोधी पक्षांनी सबळ पुरावे सादर करत केले आहेत शिवाय विरोधी पक्षांनी आपले आक्षेपही वेळोवेळी नोंदवले आहेत. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार या तांत्रिक करामतीचा अवलंब करुन दुरुस्त पद्धतीने या ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या निकालामध्ये बदल करु शकतील अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.