डॉ.अमोल कोल्हे यांची टीका

मोदी आणि शहा या जोडगोळीने संपूर्ण देशाची वाट लावली आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातही जाती-पातीचे राजकारण करून तेढ निर्माण करण्याचे काम युती सरकारने केले असल्याची टीका अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी शहर परिसरातून कोल्हे यांच्या उपस्थितीत दुचाकी फेरी काढण्यात आली. जुने सिडकोतील लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरुवात झाली. शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, विजय नगर, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजामार्गे जुना आडगाव नाका येथे फेरीचा समारोप झाला. यावेळी कोल्हे यांनी भाजपवर टीका केली. पाच वर्षांत कोणताही विकास या सरकारने केलेला नसल्याने या सरकारने आता शहीद जवानांच्या नावाखाली मत मागण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत सर्वच राजकारण्यांनी जाहीरनामे केले, पण समीर भुजबळ यांनी शपथपत्र सादर केले आहे. शपथ पूर्ण केल्याशिवाय ते राहणार नाहीत, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

या दुचाकी फेरीत समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, कोंडाजीमामा आव्हाड, शरद आहेर, गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील, गुरमीत बग्गा, लक्ष्मण जायभावे आदी सहभागी झाले होते.