लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार असून आता सर्वांचे लक्ष २३ मेरोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. आगामी पंतप्रधान कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद यांनी पंतप्रधानबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आमचं लक्ष्य मोदी सरकारला हटवणे इतकंच आहे, पंतप्रधानपद काँग्रेसकडेच असावं अशी आमची भूमिका नाही, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
गुलाम नवी आझाद हे बुधवारी बिहारमधील पाटणा येथे होते. पत्रकारांनी त्यांना पंतप्रधानपदाबाबत विचारले असता आझाद म्हणाले, केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार येऊ नये हेच आमचं लक्ष्य आहे. सर्वानुमते जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य असेल. भाजपाला जर कमी जागांवर विजय मिळाला तर ‘रालोआ’तील घटकपक्ष त्यांची साथ सोडून दिल्लीत दुसऱ्या पक्षाची सत्ता आणू शकतात. ‘रालोआ’तील एकाही पक्षाची विचारधारा भाजपाच्या विचारधारेसारखी नाही. सत्तेपायी ते एकत्र असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही यात (भाजपाची साथ सोडणाऱ्या पक्षात) असू शकतात, असे त्यांनी सांगितले.
Ghulam Nabi Azad, Congress in Patna, Bihar: We have already made our stand clear. If a consensus is made in the favour of Congress, then party will take the leadership but our aim has always been that NDA govt shouldn't come. We will go with the unanimous decision. (15.05.2019) pic.twitter.com/TLJGHQQzd7
— ANI (@ANI) May 15, 2019
सरकारचं नेतृत्व काँग्रेसने करावं असं वाटत असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण हा निर्णय सर्वानुमतेच घेतला जाईल. काँग्रेसला पंतप्रधानपद मिळाले नाही तर अन्य कोणालाही पंतप्रधानपदी बसू दिले जाणार नाही ही आमची भूमिका नाही, असेही आझाद यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 2:27 pm