काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित करत अमेठीतील अपक्ष उमेदवाराने राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून यासंदर्भातील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. यादरम्यान, राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार धृवलाल यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत तक्रारदारांनी आक्षेप घेतला आहे. तक्रारदारांनी म्हटले आहे की, २००४ मधील उमेदवारी अर्जात राहुल गांधींनी बॅक ऑफ्स लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. या कंपनीची कागदपत्रे ब्रिटनमध्ये सादर करण्यात आली होती. यात राहुल गांधी हे ब्रिटन नागरिक असल्याचे म्हटले होते. भारताचे नागरिकत्व नसल्यास निवडणूक लढवता येत नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्या कंपनीत राहुल गांधींनी गुंतवणूक केली त्या कंपनीची नोंदणी लंडनमध्ये करण्यात आली असून २००५ मधील कागदपत्रांनुसार राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचे म्हटले आहे. तुम्ही ब्रिटनचे नागरिकत्व घेतले असेल तर तुमचे भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकते. त्यामुळे राहुल गांधींनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपाने केली आहे.

राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वकील राहुल कौशिक यांनी आक्षेपावर उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागितला. हा गंभीर प्रकार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.२२ एप्रिल रोजी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेपाबाबतची सुनावणी होणार आहे.