पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकींसाठीचे रणशींग आज मेरठ येथे घेतलेल्या सभेमधून फुंकले. पुढील ४४ दिवसांमध्ये पंतप्रधान मोदी देशभरामध्ये १०० हून अधिक सभा घेणार असल्याचे समजते. आज मेरठ येथे त्यांनी घेतलेल्या पाहिल्याच सभेमध्ये काँग्रेसबरोबरच सर्वच विरोधीपक्षांचा मोदींने समाचार घेतला. मात्र या सभेला म्हणावी तितकी गर्दी झाली नाही असं काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. पहिल्या रांगेत भाजपा समर्थकांची गर्दी दिसत असली तरी मागच्या अनेक रांगामध्ये रिकाम्या खुर्च्याच होत्या अशा आक्षयाचे ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी रिट्वीट केले आहे.

भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मोदींने आज पहिली सभा घेतली. मोदींच्या या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली खरी मात्र ही गर्दी केवळ पहिल्या काही रांगेत होती मात्र मागे खुर्च्या रिकाम्याच असल्याचे ट्विट माया मिरचंदानी यांनी केले. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘पहिल्या रांगेत समर्थकांची गर्दी तर मागे रिकाम्या खुर्चा, पहिल्या सभेसाठी मोदी मेरठमध्ये दाखल झाले तेव्हाचे चित्र.’

हे ट्विट आता व्हायरल होत असून काँग्रसचे नेते संजय झा यांनी हे रिट्वीट करत केवळ ‘आऊच’ इतकीच कॅप्शन या ट्विटला दिली आहे.

दरम्यान मेरठ येथे झालेल्या सभेमध्ये मोदींने भाजपा सरकारने मागील पाच वर्षांमध्ये कोणकोणती कामे केली याबद्दलची माहिती दिली. तसेच एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांवरही त्यांनी टिका केली. माझ्याकडे गमवण्यासारखे काहीच नसल्याचेही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. सपा-बसपा-रजद यांनी मागील अनेक वर्षांपासून समान्य जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही मोदींने आपल्या भाषणामध्ये केला.