लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात देशभरात जे निवडणुकीचे टप्पे पार पडले ते संपताना चर्चा होऊ लागली आहे ती एक्झिट पोलची. एक्झिट पोलच्या माध्यमातून ढोबळमानाने काही अंदाज वर्तवले जातात. निकालाचे सगळे टप्पे संपल्यावर एक्झिट पोल दाखवला जाईल. देशात रविवारी (१९ मे) संध्याकाळी एक्झिट पोल दाखवला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावरच अशा प्रकारचा एक्झिट पोल दाखवला जावा असा भारतात नियम आहे. एक्झिट पोलमध्ये निकालाचा ढोबळमानाने अंदाज वर्तवला जातो. आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Exit Poll: …या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

ओपिनियन पोल आणि सर्व्हे या दोन्हीपेक्षा एक्झिट पोल वेगळा ठरतो. त्यामुळेच हा एक्झिट पोल बऱ्याच अंशी निकालाच्या जवळ जाणारा ठरतो. ज्या दिवशी मतदान होते त्याच दिवशी माहिती गोळा केली जाते. देशात कोणत्या टप्प्यांमध्ये किती टक्के मतदान झाले? नवमतदार किती होते? साधारण मतदारांचा कौल कुणाच्या दिशेने आहे? मतदारांचा राग कोणत्या पक्षावर आहे? मतदारांना पंतप्रधान म्हणून कोणता नेता हवा आहे? कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक वाटते? हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्याची जी उत्तरं येतात त्यावरून निवडणुकीचे सगळे टप्पे संपल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज बांधला जातो. जनभावना काय असू शकते याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला असल्याने तो निकालाच्या जवळ जाणारा ठरतो. भारतात एक्झिट पोल मतदानाचे सगळे टप्पे संपल्यावरच दाखवण्यास परवानगी आहे.

Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय ?

सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.

लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. आता रविवारी म्हणजेच १९ मे रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यासाठीचं मतदान पार पडलं की एक्झिट पोल येण्यास सुरूवात होईल. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did exit poll show perfect picture of election result
First published on: 18-05-2019 at 18:08 IST