२४९ उमेदवार रिंगणात; नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. राज्यातील जालना, बारामती, अहमदनगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आदी १४ मतदार संघात तब्बल २४९ उमेदवार आपले राजकीय भाग्य आजमावणार असून मंगळवारी २३ जानेवारी या ठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या शक्तिमान नेत्यांचे राजकीय कौशल्य या निवडणुकीत पणाला लागल्याने मुलांच्या लढाईत बापांची परीक्षा म्हणून तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील पहिल्या दोन टप्प्यात १७ मतदार संघातील निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील अनेक मतदार संघातील लढती या चुरशीच्या होणार असल्याने मतदानाच्या दिवशी या सर्वच मतदार संघात चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश आयोगाने दिल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून  रविवारी संध्याकाळी तेथील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे, सुजय विखे पाटील, निलेश राणे निवडणुकीच्या आखाडय़ात उतरल्याने त्यांच्या पालकांचे राजकीय कौशल्य पणाला लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे साम्राज्य खालसा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींनी गेल्या १५ दिवसात प्रचारसभांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र ढवळून काढला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर पश्चिम महाराष्ट्रातच तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभांच्या माध्यमातून पंतप्रधान आणि भाजपला लक्ष्य केल्याने पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच अहमदनगर, हातकणंगले, बारामती, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग या मतदार संघातील मतदान चुरशीचे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशभरातील चित्र..

संपूर्ण देशात ११५ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यापैकी निम्म्यांपेक्षा जास्त म्हणजे ६२ मतदारसंघांत भाजपचे सध्या खासदार आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकावर भाजपची तर केरळवर काँग्रेसची मदार आहे.