पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या 24 शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.

नरेंद्र मोदींविरोधात एकूण 119 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामधील 89 शेतकऱ्यांचा अर्ज आधीच रद्द करण्यात आला होता. यानंतर निजामाबादमधील 55 आणि तामिळनाडूमधील 40 शेतकऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, पण अखेर निजामाबादमधील 25 आणि तामिळनाडूमधील पाच शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निजामाबादमधील 25 उमेदवारांपैकी 24 उमेदवारांचे अर्ज गुरुवारी रद्द करण्यात आले. वाराणसीत उपस्थित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

याआधी तेलंगणामध्ये निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून 117 शेतकऱ्यांनी सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीविरोधात (टीआरएस) निवडणूक लढवली होती. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी अर्ज आल्याने मतदानादिवशी निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर अतिरिक्त ईव्हीएम मशीन आणल्या होत्या. याशिवाय मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून 2014 लोकसभा निवडणूक लढवली होती. मोठ्या अंतराने नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मोदींविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्येही ते मोदींविरोधात लढले होते. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं असून 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.