नामदेव कुंभार, उस्मानाबाद

भावाने आत्महत्या करुन चार दिवस झाले. पण अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देऊन आलो. पण, सगळ्यांना निवडणूक महत्वाची वाटते. जर याप्रकरणी पोलिसांनी आणि प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा इशाराच उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडत असताना शेतकरी आत्महत्येची ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा झाल्या. मात्र, त्यांनी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. याविषयी बोलताना राज ढवळे म्हणाले, आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला होता. मात्र, सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास नको म्हणून आम्ही सबूरीनं घेतलं. पण, गेल्या चार पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.

याप्रकरणी सोमवारी उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे. तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी संबधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्यास तातडीने कारवाई होऊ शकते. येत्या काही दिवसांमध्ये कोणतीच कारवाई झाली नाही, तर भावाच्या अस्थी पोलीस स्टेशनमध्ये विसर्जित करेल. तसेच उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवणार, असा इशाराच त्यांनी दिला. भावाचा जीव तर घेतलाच आहे, बदनामी कशासाठी करताय?, असा सवालही त्यांनी विचारला. माझी राजकीय भूमिका तुम्हाला माहीत असताना एवढी गलिच्छ पातळी तुमच्या जवळचे लोक गाठतील असे मला वाटले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज ढवळे यांनी ओम राजे यांना काही प्रश्न देखील विचारले असून काय आहेत हे प्रश्न जाणून घेऊया..
१) मी किंवा माझा भाऊ मयत दिलीप ढवळे यांनी आपल्यासाठी काय करायचे राहिले होते ?
२) माझा भाऊ आणि मी तुमचे कार्यकर्ते होतो, प्रत्येक निवडणुकीत मी तुम्हाला सहकार्य केलं आहे याची आपल्याला जराही जाणीव आहे का नाही ?
३) माझा भाऊ जिवानिशी गेला तरी आपण साधा फोनसुध्दा केला नाहीत. पण तिकीट घेण्यापूर्वी मला फोन करत होतात.
४) माझ्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना मी आपल्याला काय त्रास दिलेला नसताना, माझ्या मयत भावाची आणि आमच्या कुटुंबीयांची बदनामी तुमचे कार्यकर्ते करत आहेत ते तुम्ही रोखू शकत नाहीत का ?
५) भावाची चिठ्ठी बोगस आहे का नाही हा तपास पोलीस प्रशासन करत असताना तुमचे लोक आजच बळी गेलेल्या व्यक्तीचा किती वेळा बळी घेणार आहेत.
६) तुम्ही निवडणूक जनतेसाठी लढवत असाल तर त्या जनतेत माझा भाऊ किंवा माझे कुटुंब येत नाही का ?
७) राजकारणासाठी मी काय विरोध केला ?