भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. उमेदवारी जाहीर होताच मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी पक्षात जबाबदारी एकमेकांना दिली जात असते, यात काही नवीन नाही असं सांगितलं आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, 'मनोज कोटक यांच्यासाठी मी खूप आनंदी आहे. आम्हा सर्वांचा त्यांना पाठिंबा असून, ते जिंकतील यासाठी प्रयत्न करु. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत हेच आमचं ध्येय आहे. पक्षात जबाबदारी एकमेकांवर दिली जात असते. यामध्ये काही नवीन नाही'. देशात नरेंद्र मोदींचं सरकार यावं यासाठी लागेल ते सगळं करणार आहे असं सांगताना मनोज माझ्या धाकट्या भावासारखा असून त्याच्या विजयाची जबाबदारी आपली असेल असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. Kirit Somaiya,sitting BJP MP from Mumbai North East: Very happy that Manoj Kotak ji standing with me here has got the ticket. We all will support him and ensure he wins.Ultimately our aim is a second term for Modi ji. Responsibilities within party keep shifting,nothing new in it. pic.twitter.com/5sIE2XCGcX — ANI (@ANI) April 3, 2019 किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्यं केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती. BJP releases 16th list of 6 candidates in Maharashtra and Uttar Pradesh for #LokSabhaElections2019 . Manoj Kotak to contest from Mumbai North East (where Kirit Somaiya is the sitting MP), Dinesh Lal Yadav 'Nirhua' to contest from Azamgarh (UP) against SP's Akhilesh Yadav. pic.twitter.com/uQvwJpGRSl — ANI (@ANI) April 3, 2019 ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांना भाजपची उमेदवारी मिळण्यावरून शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाहीर टीका करत सोमय्या यांना आव्हान देण्याची भाषा केली होती. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी निरोप घेताना उद्धव ठाकरे यांच्या भेटीची इच्छा सोमय्या यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या भेटीचा प्रयत्न झाला पण ती भेट होऊ शकली नव्हती. मात्र, उद्धव यांना भेटण्यासाठी औपचारिकपणे सोमय्या यांनी मातोश्रीवर विचारणा केली नव्हती, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.