मतदानयंत्रांच्या मुद्दय़ावरून अमित शहा यांनी सुनावले नवी दिल्ली : विरोधक जनादेशाचा अनादर करत असून, संभाव्य पराभवाच्या धास्तीने मतदान यंत्राबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. मतदानाच्या सहाव्या टप्प्यानंतरच केवळ मतदान यंत्रांबाबत आक्षेप घेण्यास त्यांनी सुरुवात केली. मतदानोत्तर चाचण्यांनंतर मतदान यंत्रावर खापर फोडणे त्यांनी सुरू केल्याची टिप्पणी शहा यांनी केली आहे. मतमोजणी पद्धतच बदलण्याची २२ विरोधी पक्षांची मागणी लोकशाहीविरोधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदान यंत्रात गडबडीचा आरोप करत हिंसाचाराचा इशारा काही नेत्यांनी दिला होता. त्यांचा संदर्भ उपेद्र कुशवाह यांनी रक्तपात होईल या वक्तव्याकडे होता. मात्र लोकशाहीत अशा घटनांना स्थान नाही तसेच लोकशाहीला कोण आव्हान देत आहे? असा सवाल शहा यांनी विचारला. विरोधक देशाची तसेच लोकशाहीचा अवमान करत असून, याबाबत शंका उपस्थित करून जगात आपली प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप शहा यांनी केला आहे. ही मागणी केवळ स्वार्थी हेतूने केली जात असून त्याला काही आधार नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. या मतदान यंत्रांच्या आधारे कधी ना कधी काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, डावे पक्ष तसेच राष्ट्रीय जनता दलाने विजय मिळवला आहे. जेव्हा विरोधक जिंकतात तेव्हा तेव्हा त्यांचा विजय, पराभूत होतात तेव्हा मतदान यंत्रांवर खापर फोडायचे? तुमचा जरा मतदान यंत्रांवर विश्वास नाही तर यश मिळाल्यावर सरकार का स्थापन केलेत असा सवाल शहा यांनी विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. त्यामुळे विरोधक न्यायालयावरही प्रश्न उपस्थित करत आहेत काय? असा प्रश्न शहा यांनी विचारला आहे.