Lok Sabha Election 2019 updates: ५४२ मतदारसंघापैकी भाजपा तब्बल ३०३ मतदारसंघांमध्ये आघाडीवर असून काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. डीएमके २३, तृणमूल काँग्रेस २२, वायएसआर काँग्रेस २२ आणि शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ आणि बिजू जनता दल १२ जागांवर आघाडीवर आहे. सद्यपरिस्थितीनुसार रालोआ ३४७, यूपीए ८६ आणि अन्य पक्ष १०९ जागांवर आघाडीवर असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे. १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी सुरू झाली आणि सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन १९ मे रोजी संपली. यावेळी अपक्षांसह विविध पक्षांचे आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपाने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे यंदा भाजपाने २०१४ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये 'एनडीए'ने तब्बल ३३६ चा आकडा गाठला. तर यूपीएला फक्त ६० जागांवरच समाधान मानावे लागले होते. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून यात भाजपा २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागेवर आघाडीवर आहेत. काँग्रेस, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे राहुल गांधी यांचा पराभव झाला असून हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा आहे. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी या विजयी झाल्या आहेत.