देशात आज दुसऱ्या टप्प्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१.१२ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार होते. २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी बुलडाणा ५७.०९ टक्के, अकोला ५४.४५ टक्के, अमरावती ५५.४३ टक्के, हिंगोली ६०.६९ टक्के, नांदेड ६०.८८ टक्के, परभणी ५८.५० टक्के, बीड ५८.४४ टक्के, उस्मानाबाद ५७.०४ टक्के, लातूर ५७.९४ टक्के आणि सोलापूर ५१.९८ टक्के. देशात इथे झाले मतदान तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान झाले. ओदिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान झाले.