शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हातात का घेतले याचा खुलासा खुद्द डॉ.अमोल कोल्हे यांनी शनिवारी केला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने मला उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न केला होता. पण, त्याच क्षणी त्यांना उत्तर देत मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नसल्याचे सांगत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला. डॉ. अमोल कोल्हे खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगता सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचाराची आज (शनिवार) सांगता झाली. या सभेत बोलताना डॉ. कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यावर आत्‍तापर्यंत मौन धारण करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी आज खुलासा केला. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या फोटोबाबतही कोल्हे म्हणाले, अभिनेता कशाला हवा अशी विचारणा होते. पण सातार्‍यातुन निवडणूक लढवणार का हे शिवसेनेकडून विचारण्यात आले होते. उदयनराजेंच्या विरूध्द निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच आपण शिवसेना सोडली.

सांगता सभेत बोलतान अजित पवार यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, देवेंद्र बाबा इथं येऊन बघ किती शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. नुसतं पोपट वाणी बोलू नका. मुख्यमंत्री झाल्यापासून ते जॅकेट घालू लागलेत. त्यांनी ते घालावं पण शेतकऱ्यांची फसवणूक का केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसली. त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही. विजेचे दर वाढवले. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. सांगा, गेल्या ५ वर्षात माझ्या पुणे जिल्ह्यात कोणती नवी इंडस्ट्री आली? मागच्या वेळेस फसलात, यंदा फसू नका! आपली नाणी खणखणीत दिली आहेत. ती खणखणीत वाजलीच पाहिजेत!

डॉ अमोल कोल्हे यांना निवडून दिल तर दोन-दोन काम होणार. एकतर तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आला तर ते पण सुटणार आणि काही दुखत असलं की लगेच इंजेक्शन, इलाज. त्यांना लगेच आठवण करून द्यायचं घड्याळ्याचं बटन दाबलं होतं. असे अजित पावर म्हणाले.