-शिवराज यादव

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाज, निर्णयांवर टीका होत असताना नरेंद्र मोदींचं समर्थन करणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. इलचकरंजी मेडिकल असोसिएशन संस्थापक सदस्य डॉ ए के चौगुले यांनीदेखील नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामकाजावर समाधानी असल्याची भावना व्यक्त करत १०० टक्के पुन्हा एकदा भाजपाला संधी दिली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे वैद्यकीय क्षेत्राला काही फटका बसला का विचारलं असता, त्यांनी डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला आहे असं वाटत नाही असं सांगितलं. मोदी सरकारच्या योजना चांगल्या आहेत फक्त त्यांची अंमलबजावणी करण्यात थोडे कमी पडत आहेत असंही ते यावेळी म्हणाले. मोदी सरकार जे काय करतंय त्याला पूर्ण पाठिंबा असून ते खूप चांगलं काम करत आहेत अशी स्तुतीही त्यांनी यावेळी केली.

निवडणुकीत जातीवाद, पक्षाकडे. नातेवाईकांकडे बघून केली जाते अशी खंत व्यक्त करताना कोणीतरी आश्वासनं देतंय म्हणून फक्त मत न देता त्यापेक्षा ती व्यक्ती आश्वासन पूर्ण करण्यात यशस्वी होईल का हे पाहणं जास्त महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आलं पाहिजे असं वाटतं का ? विचारलं असता त्यांनी १०० टक्के आलं पाहिजे असं सांगितलं.

गेल्या पाच वर्षातील सरकारचं कामकाज पाहिलेलं असून याआधी कशा पद्दतीने काम होत होतं हे आम्ही पाहिलं आहे. भाजपाने जे पाच वर्षात केलं आहे त्यात ते काही १०० टक्के यशस्वी झाले नाहीत, पण त्यांनी ज्या काही योजना राबवल्या त्या चांगल्या आहेत, फक्त त्यांची अंमलबजावणी करण्यात वेळ लागेल. असंच मोदींनी करत राहावं. जर त्यांच्याकडून चूक झाली किंवा आधीच्या सरकारप्रमाणे वागू लागले तर लोक पुढच्या निवडणुकीत त्यांना बदलतील असं चौगुले यांनी सांगितलं.

जे काही निर्णय सरकारने घेतले ते ़ गरज होती, विकास करण्यासाठी घेतले. जीएसटी आम्हालाही आधी माहिती नव्हतं. नंतर सर्वांनीच पाठिंबा दिला. स्वच्छ भारत सर्वात चांगली योजना आहे. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकचा निर्णयही चांगला होता असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींना माणसांची चांगली ओळख असून सुरेश प्रभू, मनोहर पर्रीकर, स्मृती इराणी यांच्यासारखी माणसं निवडली असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी कोणताही कागद हातात न घेता आणि सडेतोड बोलतात अशी स्तुतीही त्यांनी यावेळी केली. पण आपल्या देशात पुर्वीपासून पाय ओढण्याची सवयच आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.