India TV-CNX च्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता आहे. इंडिया टिव्ही आणि सीएनएक्सने देशभरात केलेल्या सर्वेनुसार, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. तर काँग्रेसला फक्त ९७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसपेक्षा अन्य पक्षाच्या जागा जास्त येऊ शकतात असा अंदाज या सर्वेतून व्यक्त केला आहे.

सर्वेक्षणातून लोकसभेच्या सर्व ५४३ जागांचा वेध घेण्यात आला आहे. त्यानुसार भाजपाला २३० जागा मिळू शकतात तर काँग्रेस ९७ जागांपर्यंत मजल मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मित्रपक्षासह भाजपा (एनडीए)ला २७५ जागा मिळतील, यूपीएला १४७ जागा मिळतील तर अन्य पक्ष १२१ जागांपर्यंत मजल मारतील. अन्य पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला २८, बीजू जनता दलाला १४, शिवेसनेला १३, समाजवादी पक्षाला १५, बसपाला १४, राजदला ८, जदयुला ९ जागा मिळतील, असा अंदाज सर्वेक्षण सांगते.

सर्वेनुसार, २०१४ च्या तुलनेत एनडीएला महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशमध्ये फटका बसू शकतो. उत्तर प्रदेशात भाजपला ४५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीला ३४ जागा मिळू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.