माधव भांडारी यांचा सवाल

सांगली : मनमोहनसिंग सरकारच्या काळात कृषी खाते शरद पवार यांच्याकडे असताना स्वामिनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारला नाही, मात्र मोदी सरकार सत्तेवर येताच या आयोगाच्या शिफारसींची आठवण कशी झाली, याचा खुलासा स्वत पवारांनी करावा, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले.

सांगली येथे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ हरिपूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत असताना श्री. भांडारी म्हणाले, की सत्तेवर असताना शेतकऱ्याचे कैवारी म्हणवून घेणारे श्री. पवार यांना आताच शेतकरी वर्गाबाबत इतकी आत्मीयता का वाटत आहे? त्या वेळी जर या आयोगाच्या शिफारसी अमलात आणल्या असत्या, तर प्रश्न सुटले असते. मात्र सत्ता जाताच त्यांना सरकारविरुद्ध बोलण्यासाठी हा विषय हवा आहे.

सत्तेवर असताना आयोगाच्या शिफारसी का स्वीकारल्या नाहीत याचा जाहीर खुलासा त्यांनी करावा.

या प्रसंगी दीपक शिंदे म्हणाले, की संजयकाकांनी टेंभू-म्हैशाळ-ताकारी या रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध करून दिला. रेल्वेचे दुहीकरण करण्याचे काम सुरू केले. विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. यामुळे जनतेचा भाजपवर विश्वास दुणावला आहे.

माजी आमदार नितीनराजे शिंदे म्हणाले, एक उमेदवार वारसाच्या नावावर मते मागतो, तर दुसरा उमेदवार जातीच्या नावावर मते मागतो. पण भाजपचे उमेदवार मात्र ५ वर्षांत केलेल्या विकासाच्या कामांवर मते मागत आहेत. याचा विचार जनतेने करावा.

या सभेला माजी शहराध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेविका भारतीताई दिगडे, ऊर्मिला बेलवलकर, महापौर संगीता खोत, रासपचे प्रवक्ते लक्ष्मण हाक्के, हरीपूरचे सरपंच विकास हणबर, उपसरपंच सरिता साळुंखे, जि.प. सदस्या शोभाताई कांबळे आदी उपस्थित होते.