अहमदनगर मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे यांनी मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. सुजय विखे यांच्याकडे सध्या 277597 आघाडी आहे. मतमोजणीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे ऐवढी मोठी आघाडी तोडणे राष्ट्रवादीला शक्य नसल्याचे दिसतेय. त्यामुळे नगरमध्ये सुजय विखेंचा विजय निश्चित मानला जात आहे. सुरूवातीच्या कलांपासून घेतलेली आघाडी सुजय विखे यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली आहे. सहा लाख 96 हजार नऊशे 21 मते घेत सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 419364 मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदार संघातून भाजपाकडून दिलीप गांधी खासदार म्हणून निवडून आले होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने न सोडल्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. सुजय विखे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाची येथील ताकद वाढली. त्याचा परिणाम निकालावर दिसून येत आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही या मतदार संघामध्ये सभा झाली होती. राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप या दोन युवकांमध्ये चुरशीची लढत होत आहे. विरोधी पक्षनेते असले तरी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपचा उमेदवार असलेल्या पुत्राच्या मागे सारी ताकद उभी केली आहे. विखे-पाटील यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव करण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. सुजय विखे आणि संग्राम जगताप या लढतीमध्ये खा दिलीप गांधी आणि आमदार शिवाजी कर्डीले नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. कारण खा. दिलीप गांधी यांचे नाकारलेले तिकीट आणि मोदींच्या सभेत त्यांचा झालेला अपमान. या मुळे नाराज झालेले खा दिलीप गांधी नेमकी काय भूमिका घेणार आहेत याबाबतची उत्सुकता शीगेला पोचली होती. पण भाजपामधील जुने आणि सुजय विखे समर्थक यांची सांगड डॉ विखे यांना घालण्यात यश आले का ? त्याच बरोबर खा गांधी यांना आपल्याकडे वळवण्यात कितपत यश आले हे निकालानंतरच स्पष्ट होईल.