Maharashtra Lok Sabha Election : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे कल हाती आले असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार बहुमताने सत्तेत आलं आहे. एकीकडे केंद्रात भाजपा सरकार येणार की काँग्रेसला सत्ता मिळणार याची उत्सुकता असताना महाराष्ट्रात मतदारांनी काय कौल दिला आहे याकडेही अनेकांच्या नजरा होत्या. महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना युतीला आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधीची रंगीत तालीम आहे असं म्हटलं जात होतं. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात पुन्हा एकदा मोदी सरकारची हवा आहे असं स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडलं होतं. ११ एप्रिलला ७, १८ एप्रिलला १०, २३ एप्रिलला १४ आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान पार पडलं होतं. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अटीतटीची लढत झाली असून अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत विशेष म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. वंचित बुहुजन आघाडी सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवत होते. प्रकाश आंबेडकर यांनी पराभव मान्य केला असून ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकीकडे शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला तर मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या पराभवानेही आघाडीला धक्का बसला आहे. दुसरा एक मह्त्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात प्रचार करुन देखील भाजपा-शिवेसेनेला कोणताही तोटा झाला नाही. राज ठाकरेंच्या प्रचारामुळे युतीच्या जागा कमी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज ठाकरे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना अनाकलनीय अशी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.