मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला आजपासून मुंबईतून सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना मोदी फकीर कसला हा तर बेफिकीर अशा शब्दात मोदींवर टीका केली. २०१४ मध्ये गुजरातमध्ये भाजपाला जे मतदान झालं होतं त्याप्रमाणात २०१७ विधानसभेला भाजपाने १६५ जागा जिंकल्या पाहिजे होत्या. पण भाजपाने फक्त ९९ जागा जिंकल्या त्यावरुन परिस्थिती लक्षात येते असे राज ठाकरे म्हणाले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागत आहेत. हल्ल्याची पूर्वसूचना असूनही जवानांच्या सुरक्षेसाठी त्यांनी पावले उचलली नाहीत असा आरोप त्यांनी केला. सरकार बदलेल तेव्हा मोदी-शाह तुमच्या कार्यालयावरही धाडी पडतील. नोटबंदीची चौकशी होईल तेव्हा १९४७ नंतरचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर पडेल असा दावा राज ठाकरे यांनी केला.

एचएएलकडे विमान बनवण्याची क्षमता असताना अनिल अंबानींना कंत्राट का दिलं?. ६०० कोटीचे राफेल १५०० ते १६०० कोटीमध्ये विकत घेतोय. अनिल अंबानींनी कधी विमान बनवलं आहे का? असा सवाल त्यांनी केला. जेट एअरवेज बंद पडल्यामुळे हजारो वैमानिक, कर्मचारी बेरोजगार होणार होते मग सरकारने हस्तक्षेप का नाही केला?. जेट एअरवेज कोणाच्या घशात घालायची आहे? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

कॅप्टन अमोल यादव यांना महाराष्ट्र सरकारने पालघरला १८५ एकर जागा देऊ. ३५ हजार कोटी प्रकल्पामध्ये गुंतवू असं सांगितलं. पण त्यांची फसवणूक झाली आहे. आता अमोल यादव देश सोडून अमेरिकेला निघाले आहेत असे राज ठाकरेंनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना शांतपणे झोपू देण्यासाठी दोन दिवस सभांमधून ब्रेक घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या सभांनी भांबावून गेले आहेत. काय उत्तर द्याच ते त्यांना कळतं नाहीय. भाजपाचा मूळ पुरुष म्हणजे मोदींनी खोटं बोलून ठेवलयं. त्यामुळे काय उत्तर द्यायच ते कळत नाहीय. उत्तर देता येत नाही म्हणून मला शरद पवार चालवतायत असा आरोप करत आहेत असे राज म्हणाले. २०१४ आधी मी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. हे नाकारणार नाही. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढले आता भाजपाचे कपडे काढणार. भाजपा काँग्रेसपेक्षा नालायक निघाली असा आरोप राज ठाकरेंनी केला.