‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही. त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे. तिहार जेलच्या आत जो गेला आहे तो काही बोलेल का, हा प्रश्न त्यांना छळतो आहे. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील, तो दिवस दूर नाही’, असं सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदींचा इशारा नेमका कोणाकडे होता ? तिहार जेलमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे ? असे अनेक प्रश्न नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहेत. नरेंद्र मोदींची राज्यातील दुसरी प्रचारसभा गोंदियात पार पडली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी महायुती महाराष्ट्रातील महाभेसळ साफ करणार असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. सभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. घराणेशाहीला संपृष्टात आणण्याचा विडा उचलला आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कटाचा भाग अशी टीका केली.

पाच वर्षे यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली असं सांगत तुमच्या सहकार्याने विकासाचा नवा हायवे तयार होईल असं नरेंद्र मोदींनी यावेळा सांगितलं. यावेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला. ‘दिल्लीत एसीमध्ये बसलेले लोक रोज नव्या गोष्टी सांगत आहेत. मोदीचं नाव घेतलं की त्यांची झोप उडत आहे. लोक बालाकोट विसरले असं म्हणत आहेत. त्यांना मला सांगायचं आह की देश अजून 1962 चं युद्ध विसरलेला नाही तर बालाकोट कसा विसरेल’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा देश प्रथम येतो नंतर पक्ष असं सांगताना देशाने आता आपली दिशा आणि गती बदलली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. काँग्रेसकडून पुन्हा एकदा देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून देशावर पूर्ण कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला.

काँग्रेसला मोदी असल्याने लोकांचं भलं होतं आहे आणि आपली मलाई जात असल्याची चिंता सतावत आहे असा टोला यावेळी नरेंद्र मोदींनी लगावला. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या षडयंत्रांची योजना असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादीचा शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहे का सांगावं असं आवाहन केलं आहे. तसंच शरद पवार शांत का बसले आहेत ? असा सवालही विचारला. सुरक्षादलांना दुर्बळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसशी सहमत आहे का हे सांगावं अशी विचारणा मोदींनी केली आहे.