विधानसभा निवडणुकीची घोषणा पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. मुलींवर अत्याचार केले,” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारवर टीकास्त्र डागलं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले,”बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला,” अशी टीका मोदी यांनी केली.

“बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. इथल्या बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस, त्यांचा बंगाल विरोधी वागणूक आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कुणालाही शंका राहणार नाही,” असंही मोदी म्हणाले.

“या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. विश्वास बंगालच्या विकासाचा. बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा. बंगालचं पुनर्निर्माण करण्याचा. विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही २४ तास काम करू. कष्ट करण्यात कोणताही कुचराई करणार नाही,” असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.