लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सोमवारी वर्धा येथे होत असून या पार्श्वभूमीवर मोदींनी सकाळी मराठीत ट्विट केले आहे. “केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले गट) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे”, असे मोदींनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होत असून प्रत्येक टप्प्यात दोन अशा रीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आठ प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. यातील पहिली सभा आज (सोमवारी) वर्धा येथे होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी मराठीतून ट्विट केले.

“महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार, आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे”, असे त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी राज्यातील मतदार युतीलाच पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, ३ एप्रिल रोजी देखील मोदी गोंदिया येथे प्रचार सभा घेणार असून राज्यातील शेवटची प्रचारसभा ते मुंबईत घेण्याची शक्यता आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात १४ जागांसाठी तर चौथ्या टप्प्यात १७ जागांसाठी मतदान होणार आहे.