अकोला : मतदानोत्तर चाचणीमध्ये काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमातून कार्यकर्त्यांना धीर देणारा संदेश दिला. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचे दाखवण्यात येत आहे. शिवाय स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर अकोला व सोलापूरमधून विजयी होऊ शकणार नाही, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीत वर्तवण्यात आला. या पाश्र्वभूमीवर अॅड. आंबेडकर संदेशात म्हणतात की, ‘मतदानोत्तर चाचणीमध्ये निकाल काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असेल. अकोला आणि सोलापुरात उमेदवार म्हणून फार वेळ देऊ शकलो नाही. तरीही कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जिद्दीने लढत दिली.’ भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनीही मतदानोत्तर चाचणीवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. मतदानोत्तर चाचण्या अंदाजाच्या आधारे मांडल्या जातात. हे अंदाज बऱ्याचदा चुकतात. सोलापूर आणि अकोला या बहुजन समाजाच्या अस्मितेच्या लढतीत, आपला विजय नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.