मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका
मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) विशेष न्यायालयाने फेटाळली आहे. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणे हे न्यायालयाच्या अखत्यारित येत नाही. याचा निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपाने भोपाळ येथून उमेदवारी जाहीर केली आहे. साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास मनाई करण्याची मागणी करणारी याचिका स्फोटातील मृताच्या वडिलांनी एनआयए न्यायालयात केली होती. आरोग्याच्या कारणास्तव साध्वीला जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु ती रखरखत्या उन्हात निवडणूक लढवण्यास ठणठणीत असेल तर तिने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला होता. सय्यद अजहर या मृताचे वडील निसार अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली होती.

बुधवारी न्यायालयात या अर्जावर न्या. विनोद पडाळकर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. न्यायालय साध्वीला निवडणूक लढवण्यापासून रोखू शकत नाही, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. तेच यासंदर्भात योग्य ते निर्णय घेऊ शकतात, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने प्रज्ञासिंह यांना दिलासा मिळाला आहे.