राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे माझ्या विरोधात माढय़ातून लढणार होते, त्यासाठी त्यांनी सर्व तयारीही केली होती. ऐनवेळी मला घाबरून त्यांनी माढय़ातून माघार घेतली, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते पुण्यात बोलत होते. यावेळी बारामती मतदारसंघाचे उमेदवार नवनाथ पडळकर हे देखील उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, शरद पवारांनी मावळमधून नातवाला उमेदवारी दिली. पण या नातवाला काही बोलता येत नाही, त्यामुळे ते जर नातवाचे सर्व गुणगान सांगत बसले तर म्हातारपणात शॉक बसायचा आणि माझ्यावर आरोप व्हायचा म्हणूनच पवारांनी माढ्यातून माघार घेतली, अशा शब्दांत आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

दरम्यान, घराणेशाहीच्या विळख्यात अडकलेली लोकशाही बाहेर काढायची असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
बहुतेक जनता आजही अन्न-पाण्यावाचून वंचित असल्याने सध्याची निवडणूक फार महत्त्वाची आहे. प्रत्येक घटकाला वंचित बहुजन आघाडी न्याय देणार आहे. त्यामुळे या निवडणुकीद्वारे जातीची, धर्माची, मक्तेदारी संपुष्टात येणार असल्याची भूमिका यावेळी आंबेडकर यांनी मांडली.

आजच्या सत्ताधाऱ्यांमुळे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे तुरुंगाबाहेर आहेत, आपली सत्ता आल्यावर त्यांना लवकरच आत टाकण्यात येईल. तसेच महात्मा गांधींना गोळ्या घालण्याची प्रवृत्ती आजही जिवंत आहे. ही प्रवृत्तीच नष्ट करायची असल्याचे ते यावेळी म्हणाले.