अमित उजगारे/कृष्णा पांचाळ घराणेशाही आणि शिक्षणावरून अनेक उमेदवारांचे विरोधक भांडवल करताना पाहायला मिळत आहेत. यावर महाविद्यालयीन तरुणांनी आपलं मत लोकसत्ता ऑनलाइनकडे व्यक्त केलं आहे. यावेळी तरुणांनी तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवाराला पसंती दिल्याचं पहायला मिळालं, तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तगडा राजकीय अनुभव असल्याने ते तरुणाचे प्रश्न सोडवण्यास सक्षम राहतील अस काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. २९ एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदार संघाचे मतदान होणार आहे. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ अजित पवार यांच्या रंगतदार लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. शुभम शेळके हा महाविद्यालयीन तरुण सांगतो की, जनेतेचे प्रश्न सोडवणारा खासदार हवा असून केवळ ए.सी मध्ये बसून प्रश्न सोडवणार नसावा. त्याने थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे, मात्र अस बहुतांश होताना दिसत नाही. घराणेशाही बद्दल बोलताना शुभम म्हणाला, त्याला आपण त्याच्या घराणेशाहीवरून तो योग्य आहे की नाही हे सांगू शकत नाही. परंतु, तो नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पाहिजे. लहू येनपुरे हा तरुण म्हणतो, उमेदवार हा तरुण असला पाहिजे जेणेकरून तो युवकांचे प्रश्न समजू शकेल. येणाऱ्या काही वर्षात भारत हा सर्वात तरुण युवक असलेला देश होणार आहे. त्यामुळे,आमदार खासदार,तरुणच हवेत,ते तरुणाचे प्रश्न सोडवतील अस त्याच म्हणणं आहे. तर मोरे श्याम जालिंदर म्हणतो, मतदान करताना उमेदवारांची पात्रता पाहिली पाहिजे. निवडणुकीत अनेकदा जात हा मुद्दा उपस्थित होतो. अशा नेत्यांना मतदान करू नये. जातीचं राजकारण करू नये यामुळे आपआपसात वाद होणार नाहीत. सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे कमी उच्च शिक्षित नसले तरी त्यांना राजकारणातील जास्त अनुभव आहे. ते तरुणाचे प्रश्न समजून घेऊ शकतात. पार्थ पवार हे निवडून येने कठीण वाटत आहे. श्रीरंग बारणे यांनी विकास केलाय, ते निवडून येऊ शकतात. ऋषिकेश क्षीरसागर सांगतो की, घराणेशाही चुकीची म्हणू शकत नाहीत. तो उमेदवार सक्षम असेल तर काही हरकत नाही. पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणात तो गोंधळलेला जास्त वाटत होता. पुढे चालून ते चांगलं भाषण करतील. श्रीरंग बारणे हे अनुभवी राजकारणी आहेत तर पार्थ पवार हे तरुण आणि उच्चशिक्षित आहेत.