धार्मिक तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. सोलापुरात भाजपाचे सिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत होती. या लढतीत सिद्धेश्वर स्वामी यांचा विजय झाला. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा हा सलग दुसरा पराभव ठरला. यानंतर जेव्हा ते प्रसारमाध्यमांसमोर आले त्यावेळी त्यांनी धार्मिक तेढ करणारे विजयी झाले असं म्हटलं आहे. पराभव झाला असला तरीही लोकांची सेवा मात्र सातत्याने करत रहाणार असेही सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीमुळे आम्हाला फटका बसला हे मान्य करावं लागेल. सुरूवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीचा फटका आम्हाला बसेल असं वाटत होतं. तसंच ते घडलं असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. जो पराभव झाला तो मला अपेक्षित नव्हता. मात्र जनतेने जो निर्णय दिला आहे त्यामुळे त्यांच्यापुढे मान झुकवली पाहिजे असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही तत्त्वं समोर ठेवून या निवडणुकीला सामोरे गेलो होतो मात्र धर्माच्या आधारावर मतं मागणारे यशस्वी झाले असंही सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

२०१४ मध्येही सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र त्याच पराभवाची पुनरावृत्ती होईल असे वाटले नव्हते असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र जनतेचा कौल मान्य आहे असे म्हणत त्यांनी सिद्धेश्वर स्वामी यांचे अभिनंदनही केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धार्मिक तेढ निर्माण करणारे विजयी झाले अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.