b पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत निवडणूक निकालांबाबत चर्चा होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांसह, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. निवडणुकीच्या निकालांबाबत आणि पक्षाचे कच्चे दुवे आणि बलस्थाने या बाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

निवडणुकीचे निकाल हा आमच्यासाठी धक्का आहे, जनमत इतके आमच्याविरुद्ध असेल अशी कल्पना नव्हती, त्यामुळे वेळ निघून जाण्यापूर्वी चुका सुधारून जनतेसमोर पोहोचले पाहिजे, असेही या नेत्याने स्पष्ट केले.