वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर याचीच चर्चा

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई

राज्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून बरेच चर्वित-चर्वण झाले असले तरी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच ४८ मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ ८४० मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत जवळपास तेवढेच मतदान झाल्याचे टक्केवारी सांगत आहे. राजकीय पक्षांनी मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी समोर घेत आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या टप्प्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात लढत असलेल्या नागपूरमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्के कमी मतदान झाल्याचे दिसले. मात्र, प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता तेथील मतदानात २०१४ च्या तुलनेत ९६ हजार ७४२ मतांची वाढ झाली आहे. तर राज्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला लढवत आहेत. त्या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ नोंदवली गेली आहे. बारामती मतदारसंघातील हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? नवमतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदार असल्याचा भाजपचा दावा खरा ठरणार की पवारांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बारामतीकर हिरिरीने बाहेर पडल्याचे स्पष्ट होणार याबाबत आता उत्सुकता आहे.

मावळमध्येही वाढ

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार उमेदवार मावळ मतदारसंघातही प्रतिष्ठेची लढाई असून तेथे २०१४ च्या तुलनेत एक लाख ९१ हजार ३८९  मतांची वाढ नोंदवली गेली आहे. पुण्यात व कल्याण लोकसभा मतदारसंघात कमी मतदान झाल्याची खूप चर्चा समाजमाध्यमांवर रंगली. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत पुण्यातील मतदान ४० हजार १६४ ने तर कल्याणमध्ये ६४ हजार ३९५ मतांची वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. नंदुरबारमध्ये एक लाख ६० हजार ७७२ मतांची वाढ झाली आहे.