पालघरमधल्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इथल्या गुंडांना वाटत होतं की इथली जनता साधी भोळी आहे. इथल्या माता-भगिनींना मी गुंडगिरी बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. मला खात्री आहे की पालघरमध्ये विजय गावित यांचाच होणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

शिवसेना ही कायमच काम करणाऱ्या मर्दांच्या मागे ठामपणे उभी असते. गावकऱ्यांच्या पाठिशी मी उभा आहे. तुम्हाला जे पाहिजे ते दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पालघरमधल्या सभेत ते बोलत होते. गोरगरीबांना जो छळेल त्याला कायद्याचा फटका आम्ही देणार आहोत. तुम्ही रात्री दार ठोठावलेत तरीही मदत करणारा खासदार म्हणजे राजेंद्र गावित आहेत असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच त्यांना निवडून द्या असंही आवाहन त्यांनी केलं. आपल्याला भगव्याची परंपरा कायम ठेवायची आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

देशाच्या निवडणुकीत एक एक जागा महत्त्वाची आहे. समोरच्या उमेदवारांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्थानिक त्यांना त्यांची जागा दाखवतील असे राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे. तर श्रीनिवास वनगा यांनीही भाषण केलं. राजकारण स्वतःच्या प्रगतीसाठी नाही तर गोरगरीबांच्या प्रगतीसाठी असतं असं वनगा यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला जे पन्नास वर्षात जमले नाही ते नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात करून दाखवलं त्यामुळे त्यांनाच पुन्हा निवडून द्या असंही आवाहन वनगा यांनी केलं.